October Heat – गडचिरोलीचा (Gadchiroli) काही भाग वगळता नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी काल सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतल्याचे हवामान विभागाने (India Meteorological Department)जाहीर केले. तीन दिवसांआधी म्हणजेच शुक्रवारी मोसमी वाऱ्यांनी अहिल्यानगर, अकोलापर्यंत (Akola) माघार घेतली होती. त्यानंतर एक दिवस मोसमी वाऱ्यांचा प्रवास खोळंबला होता. दरम्यान, सध्या राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ म्हणजे उन्हाचा चटका जाणवत आहे.
सध्याची मोसमी वाऱ्यांची दक्षिण सीमा कारवार (Karwar), कलबुर्गी, निजामाबाद, कांकेर, केओंझारगड, सागर बेट, गुवाहटी येथे आहे. पुढील दोन-तीन दिवसांत मोसमी पाऊस तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरीत भागांतून माघारी जाण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाने संपूर्ण गोवा , झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम तसेच बिहारमधील काही भागांतून माघार घेतली आहे. तसेच मध्य प्रदेश (Madhya Pradesh), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), छत्तीसगड राज्यांतून मोसमी पावसाने माघार घेतली आहे.
पुढील एक-दोन दिवसांत महाराष्ट्राच्या उरलेल्या भागातून तसेच ईशान्य राज्यांतून मोसमी पाऊस माघार घेण्याची शक्यता आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या उकाडा सहन करावा लागत आहे. राज्यातून सरासरी ५ ऑक्टोबर रोजी मोसमी पावसाची माघारीची प्रक्रिया सुरु होते आणि १० ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मोसमी वारे पूर्णपणे माघारी जातात. यंदा नियोजित वेळेपेक्षा दोन ते तीन दिवस उशिराने मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
दरम्यान, आंध्र प्रदेश,तामिळनाडू, आसाम आणि बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची (Cyclonic circulations) स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वारे महाराष्ट्राकडे वाहून राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
हे देखील वाचा –
पुण्यात अभाविप – मनविसे वाद ! अमित ठाकरेंची आयुक्तांशी चर्चा
तुरुंगात गेल्यास मंत्री पदमुक्त ; इंडिया आघाडीचा समितीवर बहिष्कार
रमाबाई नगर रहिवाशांना दोन वर्षांत घरे बनवून देऊ ! मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही