Chandrapur Crime News : एका क्षुल्लक घरगुती वादाचे पर्यावसान भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना डोंगरगाव येथे घडली आहे. गुरुवारी, १९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास केवळ ‘कारल्याची भाजी का बनवली?’ या कारणावरून झालेल्या वादातून मुलाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली. सुमित्रा दशरथ पेटकुळे (६८) असे या दुर्दैवी मातेचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा जगदीश दशरथ पेटकुळे (३८) याला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुमित्रा पेटकुळे या आपला मुलगा जगदीशसोबत डोंगरगाव येथे वास्तव्यास होत्या. गुरुवारी रात्री सुमित्रा यांनी जेवणामध्ये कारल्याची भाजी बनवली होती. मात्र, ताटात कारल्याची भाजी पाहून जगदीशचा पारा चढला. त्याने ‘कारल्याची भाजी का केली?’ असा जाब विचारत आईशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वादाचे स्वरूप इतके विकोपाला गेले की, संतापाच्या भरात जगदीशने आपल्या वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्याने सुमित्रा यांचे डोके जोराने फरशीवर आदळले. या भीषण हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे सुमित्रा यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीचा पार्श्वभूमी आणि अटक-
आरोपी जगदीश हा मद्यधुंद अवस्थेत वारंवार घरी भांडणे करत असे. त्याच्या या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी चार महिन्यांपूर्वीच आपल्या दोन लहान मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. तेव्हापासून घरात केवळ मायलेकच राहत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १०३ (१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
गावात संतापाची लाट-
आईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. केवळ भाजीच्या कारणावरून पोटच्या मुलाने आईचा जीव घेतल्यामुळे संपूर्ण डोंगरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, आरोपीला कडक शासन व्हावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.










