Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र अजूनही शोकमग्न आहे. मात्र, या प्रकरणाला आता गंभीर राजकीय आणि कायदेशीर वळण लागले आहे. आमदार रोहित पवार यांनी बुधवारी विधानभवनाच्या प्रांगणात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खळबळजनक आरोप केले. अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीला वाचवण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राममोहन नायडू आणि नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) यांच्याकडून जाणीवपूर्वक हालचाली केल्या जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
अपघाताच्या दिवशीच ‘क्लीन चिट’ देण्याची घाई का?
रोहित पवार यांनी २८ जानेवारीच्या घटनाक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “ज्यावेळी अजित पवार यांचे पार्थिव रुग्णालयात होते आणि त्यांचे शवविच्छेदन सुरू होते, त्याच दिवशी दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी डीजीसीएने एक प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात नमूद करण्यात आले होते की, फेब्रुवारी महिन्यात व्हीएसआर कंपनीच्या विमानांचे ऑडिट झाले असून त्यात ‘लेव्हल-१’ (अतिगंभीर) स्वरूपाची कोणतीही त्रुटी आढळली नव्हती. केवळ डीजीसीएनेच नव्हे, तर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनीही त्याच दिवशी विमानाची सुरक्षा आणि वैमानिकाच्या कार्यक्षमतेबाबत कंपनीला ‘क्लीन चिट’ देणारे वक्तव्य केले होते. एवढ्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूनंतर चौकशी पूर्ण होण्याआधीच ही घाई कोणासाठी केली गेली?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
डीजीसीएचा नवा अहवाल आणि ‘नखाएवढे यश’
नुकत्याच समोर आलेल्या डीजीसीएच्या विशेष ऑडिट अहवालाचा संदर्भ देत रोहित पवार म्हणाले की, हा अहवाल म्हणजे आमच्या संघर्षाचे ‘नखाएवढे यश’ आहे. नव्या अहवालात व्हीएसआर कंपनीच्या विमानात उड्डाणापूर्वीचे वायुयोग्यता प्रमाणपत्र (Airworthiness Certificate), हवाई सुरक्षा आणि उड्डाण संचलन अशा सर्वच स्तरांवर अनेक गंभीर त्रुटी असल्याचे मान्य करण्यात आले आहे. “तुमच्या हलगर्जीपणामुळे महाराष्ट्राने एक जननायक गमावला आहे. अजित पवार हे केवळ उपमुख्यमंत्री नव्हते, तर ते लोकांच्या मनातील मुख्यमंत्री होते. इतक्या मोठ्या नेत्याच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनीला पळवाट का ठेवली जात आहे?” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर तोफे डागली.
देवेंद्र फडणवीस यांना साकडे आणि एफआयआर (FIR) नोंदवण्याचा निर्धार
रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. “आज आम्ही मुंबईत डीजीसीएविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, परंतु तिथे प्रतिसाद न मिळाल्यास उद्या मी स्वतः बारामतीला जाऊन पोलीस निरीक्षकांसमोर ठाण मांडून बसणार आहे. जोपर्यंत दोषी कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल होत नाही, तोपर्यंत मी तिथून हलणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
जनतेच्या लढ्याला आवाहन
हा लढा केवळ वैयक्तिक नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि सुरक्षेचा आहे, असे सांगत रोहित पवार यांनी राज्यातील जनतेला आपापल्या भागातील पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केले. २८ जानेवारीला ज्या कंपनीला निर्दोष मुक्त करण्यात आले होते, तिचा खरा चेहरा प्रसारमाध्यमे आणि जनतेच्या दबावामुळे समोर आला असल्याचे त्यांनी नमूद केले. या आरोप-प्रत्यारोपामुळे विमान सुरक्षा आणि या प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराचे पडसाद आगामी काळात अधिक तीव्र उमटण्याची शक्यता आहे.











