Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतीने आज एका विशेष पत्रकार परिषदेचे (प्रेस कॉन्फरन्स) आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत पक्षाच्या नवनियुक्त प्रवक्ते विजेता दहिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षाची पुढील रणनीती आणि आंदोलनाचा जाहीर अजेंडा स्पष्ट केला. देशातील शैक्षणिक व्यवस्थेमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारांवरून त्यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर अत्यंत शेलक्या अन् धारदार शब्दांत ताशेरे ओढले. या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाचे प्रमुख नेते अभिजित दिपके यांच्या आगामी दिल्ली दौऱ्याची अधिकृत घोषणा केली. येत्या ६ जून रोजी सकाळी ८ वाजता अभिजित दिपके हे दिल्ली विमानतळावर दाखल होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडताना विजेता दहियासहित अजून दोन प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेच्या दुरवस्थेवर थेट बोट ठेवले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यपद्धतीवर आणि धोरणांवर कडाडून टीका करताना त्या म्हणाल्या, “धर्मेंद्र प्रधान यांनी प्रथम केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) परीक्षांच्या नियोजनात प्रचंड घोळ घातला आणि त्यानंतर देशातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या प्रक्रियेतही मोठा गोंधळ निर्माण केला. यामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य आणि त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील करिअर धोक्यात आले आहे.” लोकशाहीच्या मूल्यांची आठवण करून देताना त्यांनी सरकारला अत्यंत कडक शब्दांत सुनावले. ते म्हणाले, “या देशातील जनतेने आणि तरुणांनी निवडून दिलेले सरकार हे जनतेचे सेवक आहे. आम्ही देशाचा कारभार चालवण्यासाठी एखादा ‘राजा’ निवडलेला नाही, तर जनतेची सेवा करण्यासाठी एक ‘कर्मचारी’ (Employee) नियुक्त केला आहे, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे.”
या पत्रकार परिषदेत पक्षाच्या आगामी आंदोलनाचा विस्तृत आराखडा मांडण्यात आला. ६ जून रोजी सकाळी ८ दिल्ली विमानतळावर अभिजित दिपके यांचे आगमन झाल्यानंतर, पुढची सूत्र हलवण्यात येणार आहेत. तिथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन छेडण्यासाठी पक्षाच्या वतीने दिल्ली पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागण्यात येणार आहे. जंतरमंतरवर परवानगी मिळाल्यानंतर देशातील तरुणांच्या हक्कांसाठी आणि शैक्षणिक भ्रष्टाचाराविरोधात एक मोठे धरणे आंदोलन सुरू केले जाईल.
कॉक्रोच जनता पार्टीने आपल्या या अजेंड्याद्वारे थेट केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाला जाहीर आव्हान दिले आहे. परीक्षांमधील कथित घोटाळे, पेपरफुटीचे सत्र आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चाललेला खेळ आता खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला. सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या डिजिटल चळवळीला आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरवून एक मोठे जनआंदोलन उभे करण्याचा पक्षाचा मानस आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्याची मुख्य मागणी या आंदोलनाद्वारे लावून धरली जाणार असल्याने, ६ जून रोजी होणाऱ्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.









