Chandrasekaran : भारताच्या सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या टाटा उद्योग समूहाच्या बैठकीत झालेल्या संचालक मंडळातील मतभेदांमुळे समूहाच्या महत्त्वाकांक्षा, शिस्त आणि संस्थात्मक एकात्मता याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या बैठकीत टाटा सन्सच्या संचालक मंडळाने अध्यक्ष एन. चंद्रशेखरन (चंद्रा) यांच्या कार्यकाळवाढीचा निर्णय पुढे ढकलला. टाटा समूहाच्या बैठकीत सहसा सातत्य ठेवण्यावर भर दिला जातो. परंतु टाटा समूहाचे मुख्यालय बॉम्बे हाऊसमध्ये पहिल्यांदाच कोलाहल ऐकायला मिळाला. त्यामुळे टाटा समूहातील सुरळीत प्रशासनाची प्रतिमा धुळीस मिळाली.
एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ खरे तर 2027 मध्ये संपणार आहे. या बैठकीत याला केवळ औपचारिक मान्यता मिळणे अपेक्षित होते. मात्र, संचालकांमध्ये फूट उघड पडली. विशेषतः विमानवाहतूक, इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्राहक प्लॅटफॉर्म क्षेत्रातील समूहाच्या आक्रमक विस्ताराने आर्थिक सुरक्षा धोक्यात आली आहे का, यावरून मतभेद झाले. नोएल टाटा यांनी सर्वाधिक आक्षेप घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी चंद्रशेखर यांचे पुनर्नियुक्तीचा विचार करण्यापूर्वी काही अटी संचालक मंडळासमोर ठेवल्या. त्यात होल्डिंग कंपनीचे ‘लिस्टिंग’ न करण्याची ठाम बांधिलकी, कर्जउभारणी टाळणे, उच्च जोखमीच्या प्रकल्पांमध्ये भांडवल गुंतवणुकीवर मर्यादा आणणे आणि एअर इंडियाच्या अधिग्रहणांमधून झालेल्या तोट्यांवर तातडीने नियंत्रण आणणे यांचा समावेश होता.
काही संचालकांनी हा विषय मतदानासाठी ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु चंद्रशेखरन यांनी तो पुढे ढकलण्याची विनंती केल्याचे समजते. टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट यांच्यात एकमत असेल तरच टाटा समूह प्रभावीपणे कार्य करू शकतो, असा आग्रह त्यांनी धरला. त्यानंतर व्यापक सल्लामसलत आणि एकमतासाठी चंद्रशेखर यांच्या कार्यकाळवाढीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला.
या वादामुळे विस्तारासाठी संयम बाळगायचा का? हा टाटा समूहाच्या केंद्रस्थानी असलेला मूलभूत मुद्दा पुन्हा उघड झाला. चंद्रशेखर यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, उदयोन्मुख उद्योगांमध्ये अग्रेसर कंपन्या उभारण्यासाठी सुरुवातीचे तोटे अपरिहार्य असतात. परंतु त्यांच्या टीकाकारांचे असे म्हणणे आहे की, टाटा हे नाव केवळ धाडसी पैजांवर नव्हे, तर संयम, सातत्य आणि नैतिक भांडवलावर
उभे आहे.
जानेवारी 2017 मध्ये अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी संचालक मंडळातील गोंधळानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नेतृत्व म्हणून चंद्रशेखर यांच्या पदोन्नतीकडे तांत्रिक कौशल्यावर आधारित पुनर्नियुक्ती म्हणून पाहिले गेले होते. सध्याचा विराम वाढत्या दबावाचे प्रतिबिंब आहे. आर्थिक पातळीवरची टाटा समूहाची कामगिरी संमिश्र आहे. पाच वर्षांत समूहाने उत्पन्न आणि बाजारमूल्य वाढवले असले तरी खर्च झपाट्याने वाढत असताना नफा कमी झाला आहे. संयमी भांडवलावर उभ्या असलेल्या या संस्थेसाठी ही तफावत
चिंताजनक आहे.
‘जग्वार’मुळे मतभेद
‘जग्वार’ या ब्रिटिश मोटार कंपनीचे अधिग्रहण हा मुद्दा टाटा समूहातील वादाला कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे. टाटा मोटर्सने 2008 मध्ये फोर्डकडून जग्वार आणि लँड रोव्हर या प्रतिष्ठित ब्रिटिश कंपन्या सुमारे 2.3 अब्ज पौंडाना विकत घेतल्या. या अधिग्रहणाचा मोठा गवगवा झाला. परंतु सायबर हल्ल्यामुळे जग्वारचे उत्पादन खूप घसरले. त्यामुळे टाटा समूहाचे 2 अब्ज पौडाचे नुकसान झाले. यावरून नोएल टाटा यांचे मतभेद झाले. हे नुकसान कमी करावे, असे नोएल यांचे मत होते.










