Home / महाराष्ट्र / Rinku Singh Father Death : भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहला पितृशोक; कर्करोगाशी झुंज देणाऱ्या वडिलांचे निधन

Rinku Singh Father Death : भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहला पितृशोक; कर्करोगाशी झुंज देणाऱ्या वडिलांचे निधन

Rinku Singh Father Death : भारतीय क्रिकेट संघाचा धडाडीचा फलंदाज रिंकू सिंह याच्या कुटुंबावर सध्या दु:खाचे सावट पसरले आहे. रिंकूचे...

By: Team Navakal
Rinku Singh Father Death
Social + WhatsApp CTA

Rinku Singh Father Death : भारतीय क्रिकेट संघाचा धडाडीचा फलंदाज रिंकू सिंह याच्या कुटुंबावर सध्या दु:खाचे सावट पसरले आहे. रिंकूचे वडील खचंद्र सिंह यांचे शुक्रवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते यकृताच्या (Liver Cancer) चौथ्या टप्प्यातील कर्करोगाशी झुंज देत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

खचंद्र सिंह यांची प्रकृती अचानक खालावल्याचे वृत्त समजताच, रिंकू सिंह भारतीय संघाची साथ सोडून तातडीने घरी परतला होता. कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी यांमधील संघर्षात त्याने पितृसेवेला प्राधान्य दिले. २४ फेब्रुवारी रोजी चेन्नईहून निघालेला रिंकू प्रथम दिल्ली आणि त्यानंतर थेट वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचला होता. गेल्या दोन दिवसांपासून खचंद्र सिंह यांना कृत्रिम श्वसनप्रणालीवर (Ventilator) ठेवण्यात आले होते. रिंकूने घेतलेली ही भेटच दुर्दैवाने त्यांची शेवटची भेट ठरली.

रिंकू सिंहच्या संघर्षमय प्रवासात त्याच्या वडिलांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी रिंकूच्या क्रिकेटवेडाला खतपाणी घातले होते. वडिलांच्या निधनामुळे रिंकूच्या आयुष्यातील एक मोठा आधारस्तंभ कोसळला असून क्रीडा विश्वातून त्याच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. यकृताच्या गंभीर आजाराने ग्रासलेले असतानाही त्यांनी जिद्दीने या आजाराचा सामना केला, परंतु अखेर काळाने त्यांच्यावर झडप घातली.

टी-२० विश्वचषकादरम्यान रिंकू सिंहवर पितृशोक; खचेंद्र सिंह यांची कर्करोगाशी झुंज अपयशी
गेल्या अनेक दिवसांपासून ते यकृताच्या गंभीर आजाराने (स्टेज-४ कॅन्सर) ग्रस्त होते. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात ‘रिनल रिप्लेसमेंट थेरपी’ (Renal Replacement Therapy) सुरू होती, मात्र उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

सध्या भारतीय संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत झुंज देत असून रिंकू सिंह या संघाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. मात्र, वडिलांची प्रकृती खालावल्याचे वृत्त समजताच रिंकूने कर्तव्यापेक्षा पितृसेवेला प्राधान्य दिले आणि तो तातडीने मायदेशी परतला. मंगळवारी चेन्नई येथे भारतीय संघाचा सराव सत्राचा सराव सुरू असताना रिंकूची अनुपस्थिती सर्वांच्या लक्षात आली होती. उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय रिंकूने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले आहे, त्यामुळे त्याच्या या कठीण काळात क्रीडाप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत रिंकूच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट केले होते. खचंद्र सिंह यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगतानाच, वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर रिंकू पुन्हा संघात सामील होईल, असा विश्वास कोटक यांनी व्यक्त केला होता. दुर्दैवाने, वडिलांच्या निधनामुळे रिंकूवर मोठे संकट आले आहे.

कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारीचा पेच; रिंकू सिंह वडिलांच्या भेटीनंतर पुन्हा संघात दाखल, मात्र प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर
भारतीय क्रिकेट संघाचा युवा आक्रमक फलंदाज रिंकू सिंह सध्या अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. वडिलांच्या प्रकृतीची चिंता आणि दुसरीकडे सुरू असलेला टी-२० विश्वचषक अशा दुहेरी पेचात अडकलेला रिंकू अखेर संघात परतला आहे. ज्या वेळी वडिलांची प्रकृती कमालीची खालावल्याची बातमी त्याला समजली, त्या वेळी तो भारतीय संघासोबत चेन्नईमध्ये सराव सत्रात व्यस्त होता. मात्र, पितृसेवेचे महत्त्व ओळखून त्याने सराव सत्र अर्धवट सोडून तातडीने घरचा रस्ता धरला होता.

वडिलांची भेट घेऊन आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर, रिंकू सिंह २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा चेन्नईला परतला आणि भारतीय संघात सामील झाला. त्याच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक होत असले तरी, कौटुंबिक विवंचनेमुळे त्याच्या खेळावर आणि मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या सर्व घडामोडींनंतर, २६ फेब्रुवारी रोजी चेन्नईच्या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या ‘सुपर ८’ च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात रिंकूच्या समावेशाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मात्र, या सामन्यात रिंकू सिंहचा समावेश ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये (अंतिम अकरा खेळाडू) करण्यात आला नाही. संघाच्या रणनीतीचा भाग म्हणून किंवा त्याच्या मानसिक स्थितीचा विचार करून व्यवस्थापनाने त्याला मुख्य संघात स्थान दिले नसावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरीही, रिंकूने आपली खेळाप्रती असलेली निष्ठा कायम राखत मैदानावर पर्यायी खेळाडू (Substitute Fielder) म्हणून क्षेत्ररक्षण केले.

सिलेंडर वितरणापासून ते भारतीय संघातील यशापर्यंत; रिंकू सिंहचा थक्क करणारा जीवनप्रवास-
भारतीय क्रिकेट विश्वात सध्या आपल्या फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या रिंकू सिंहचा इथपर्यंतचा प्रवास हा केवळ यशाची गाथा नसून तो एका अतोनात संघर्षाचा दस्तऐवज आहे. आज रिंकूच्या यशाची चर्चा होत असताना, त्याच्या बालपणातील गरिबी आणि वडिलांनी केलेला संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. रिंकूचे वडील खचंद्र सिंह हे गॅस सिलेंडर वितरणाचे (डिलिव्हरी बॉय) काम करत असत. एका अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या रिंकूने शून्यातून आपले विश्व निर्माण केले आहे.

रिंकूने एका मुलाखतीत आपल्या बालपणातील आठवणींना उजाळा देताना सांगितले की, त्यांचे कुटुंब खूप मोठे होते. पाच भावांच्या या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे वडिलांसाठी जिकिरीचे होते. खचंद्र सिंह केवळ स्वतःच कष्ट करत नव्हते, तर त्यांनी आपल्या पाचही मुलांना कामाची सवय लावली होती. रिंकू आणि त्याचे भाऊ त्यांच्या दुचाकीवर प्रत्येकी दोन गॅस सिलेंडर लादून हॉटेल आणि घराघरांत पोहोचवण्याचे काम करत असत. वडिलांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाला हातभार लावण्याचे संस्कार रिंकूवर लहानपणीच झाले होते.

आर्थिक विवंचना असली तरी क्रिकेटप्रती असलेले प्रेम कधीच कमी झाले नाही. रिंकूने सांगितले की, जेव्हा जेव्हा क्रिकेटचे सामने असायचे, तेव्हा त्याचे सर्व भाऊ मिळून खेळायला जायचे. घरातील सर्व जण वडिलांच्या कामात मदत करून उरलेल्या वेळात खेळाचा आनंद घेत असत. परिसरात राहणारी सहा-सात मुले एकत्र येऊन खेळासाठी लागणारे चेंडू खरेदी करण्यासाठी वर्गणी जमा करायचे. पै-पै जमा करून सुरू झालेला हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. रिंकूच्या या प्रवासात त्याचे वडील खचंद्र सिंह हे केवळ एक आधारस्तंभ नव्हते, तर कष्टाची शिकवण देणारे गुरुही होते.

वडिलांचा विरोध अन् आईची गुपित साथ; रिंकू सिंहचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतचा खडतर प्रवास-
भारतीय क्रिकेटमधील नवा ‘फिनिशर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिंकू सिंहचा इथपर्यंतचा प्रवास हा केवळ जिद्दीच्या जोरावर पूर्ण झाला आहे. सुरुवातीच्या काळात क्रिकेट खेळण्यासाठी त्याला केवळ आर्थिक चणचणीचाच नव्हे, तर कौटुंबिक विरोधाचाही सामना करावा लागला होता. रिंकूने टेनिस आणि लेदर बॉलने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील ‘मॉडर्न स्कूल’मध्ये शिक्षण घेत असताना त्याने आपल्या प्रतिभेची झलक दाखवली होती. एका आंतरशालेय स्पर्धेत अवघ्या ३२ चेंडूंत नाबाद ५४ धावांची खेळी करून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

रिंकूच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा हा पैशांचा होता. नामांकित क्लबमध्ये प्रवेश घेऊन सराव करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नसायचे. अशा वेळी त्याने हार न मानता सरकारी स्टेडियममध्ये आपले ओळखपत्र (कार्ड) बनवले आणि तिथेच नियमित सराव सुरू केला. मात्र, क्रिकेट खेळण्यासाठी लागणारे किट आणि स्पर्धांच्या प्रवेश शुल्कासाठी (एंट्री फी) जेव्हा तो घरी पैसे मागायचा, तेव्हा त्याला वडिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत असे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने वडिलांचा त्याला खेळापासून परावृत्त करण्याकडे आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याकडे कल होता.

या कठीण प्रसंगात रिंकूच्या आईने त्याला मोलाची साथ दिली. रिंकूने एका मुलाखतीत आठवण सांगितली की, “शहरात एक महत्त्वाची स्पर्धा होणार होती आणि त्यासाठी मला पैशांची अत्यंत गरज होती. वडिलांनी नकार दिल्यावर माझ्या आईने एका दुकानातून एक हजार रुपये उधार आणले आणि माझ्या हातात टेकवले.” आईच्या त्या एका हजार रुपयांच्या मदतीने आणि रिंकूच्या अपार कष्टाने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली. ज्या वडिलांचा एकेकाळी खेळाला विरोध होता, त्यांनीच पुढे रिंकूचे यश पाहून त्याला खंबीर पाठिंबा दिला.

हे देखील वाचा – Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; पत्रकार परिषद न बोलू देताच आटोपली- नेत्यांमधील आपसातील कुजबूज अन् सगळंच कॅमेऱ्याने टिपलं

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या