Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांवर अत्यंत बोचरी टीका केली. अजितदादांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असली, तरी पडद्यामागे काही नेते त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केला आहे. “अजितदादांचा नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर मोठा वचक होता. आता दादांच्या अनुपस्थितीत सुनेत्रा काकींना आपण आपल्या तालावर नाचवू शकू, अशा भ्रमात काही नेते आहेत; मात्र त्यांना लवकरच काकींच्या सक्षम नेतृत्वाची आणि ताकदीची जाणीव होईल,” अशा शब्दांत त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.
रोहित पवारांनी कालच्या पक्षीय कार्यक्रमातील काही प्रसंगांचा उल्लेख करत आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “कालच्या कार्यक्रमात व्यासपीठावर ज्या पद्धतीने वरिष्ठ नेते सुनेत्रा काकींशी वागत होते, ते पाहून आम्हाला वेदना झाल्या. कोणी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत होते, तर कोणी त्यांना बोलण्यापासून रोखत होते. इतकेच नव्हे, तर जय पवार यांनी कुठे बसावे, हे ठरवण्यापर्यंत या नेत्यांची मग्रुरी वाढली आहे. दादांच्या काळात या नेत्यांची अशी वागण्याची हिंमत नव्हती. हे चार नेते केवळ स्वतःचे राजकीय महत्त्व टिकवण्यासाठी विलीनीकरणासारख्या चर्चा घडवून आणत आहेत. मात्र, महाराष्ट्र हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहे.”
सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना रोहित पवार पुढे म्हणाले, “सुनेत्रा काकी या पवार कुटुंबाचा महत्त्वाचा घटक असून त्या अत्यंत सक्षम आणि सुसंस्कृत महिला आहेत. त्या कोणत्याही पत्रकार परिषदेला धैर्याने सामोरे जाऊ शकतात आणि प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. मात्र, कालच्या पत्रकार परिषदेत त्यांना बोलू न देता ज्या प्रकारे घाईघाईने उठवण्यात आले, त्यावरून या नेत्यांची मानसिकता स्पष्ट होते. काकींचे भाषण मी ऐकले, त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले; पण बाकीच्या नेत्यांच्या भाषणात पूर्वीप्रमाणेच काहीही अर्थ नव्हता.”
अजित पवारांच्या मृत्यूबाबत आजही जनमानसात शंका असल्याचे नमूद करत रोहित पवारांनी ‘अजितपर्व’ कधीच संपणार नसल्याचा पुनरुच्चार केला. “नवे पर्व सुरू झाले असे म्हणणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, लोकांच्या हृदयात दादांचे स्थान अढळ आहे. सत्तेचा वापर करून तपास दाबण्याचा प्रयत्न करण्याऐवजी या नेत्यांनी दादांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. पुतण्या म्हणून माझी काकींना विनंती आहे की, त्यांनी या स्वार्थी लोकांपासून सावध राहावे आणि स्वतःचा स्वतंत्र वचक निर्माण करावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.










