Jagdeep Dhankhar News: भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या वर्षी दिलेल्या आपल्या अचानक राजीनाम्याबाबत अखेर मौन सोडले आहे. राजस्थानमधील चुरू येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी आजारपणामुळे पद सोडले नव्हते, तर आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी राजीनाम्याचा मार्ग निवडला होता.
जुलै 2025 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा त्याग केला होता, तेव्हापासून त्यांच्या या निर्णयाबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या.
काय म्हणाले जगदीप धनखड?
रिपोर्टनुसार, चुरूमध्ये माजी काँग्रेस खासदार रामसिंह कस्वां यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाच्या वेळी धनखड यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी माझ्या आरोग्याबाबत कधीही निष्काळजीपणा दाखवला नाही. जेव्हा मी पद त्यागण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी कधीही असे म्हटले नव्हते की मी आजारी आहे. मी फक्त इतकेच सांगितले होते की, मी माझ्या तब्येतीला महत्त्व देत आहे आणि प्रत्येकाने ते दिलेच पाहिजे.”
त्यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या 21 जुलै 2025 च्या पत्रातही “वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी” राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला होता. मात्र, त्यानंतर त्यांच्या शांततेवर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
राहुल गांधींच्या टीकेला उत्तर?
ऑगस्ट 2025 मध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धनखड यांच्या राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “धनखड यांच्या राजीनाम्यामागे मोठी गोष्ट दडलेली आहे. राज्यसभेत नेहमी आक्रमक असणारा माणूस अचानक गप्प का झाला? ते लपून का बसले आहेत?” अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. धनखड यांच्या ताज्या विधानाकडे राहुल गांधींच्या याच टीकेला दिलेले उत्तर म्हणून पाहिले जात आहे.










