Samarjit Ghatge Join BJP : शरद पवार गटाचे (Sharad Pawar Faction) कोल्हापूरचे नेते समरजित घाटगे हे भाजपात (Samarjit Ghatge Join BJP)घरवापसी करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने घाटगे यांनी शेवटच्या क्षणी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली होती. मात्र, आता त्यांनी भाजपामध्ये परतण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या ८ एप्रिल रोजी मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.घाटगेंच्या घरवापसीमुळे महाविकास आघाडीला, विशेषतः शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे मानला जात आहे.
.या संदर्भात समरजित घाटगे म्हणाले की, मी डिसेंबर महिन्यातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. महापालिका निवडणुकीनंतर मी माझी स्पष्ट भूमिका त्यांना मांडली होती. शरद पवारांना पूर्वकल्पना देऊनच मी ही पुढची पावले उचलली आहेत.
ते पुढे म्हणाले की, भाजपा प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आमचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. कार्यकर्त्यांच्या भविष्याचा विचार करून तसेच रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला माझ्या मूळ पक्षात परत आल्याचा मला अभिमान आहे. देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी केवळ नेते नसून मोठ्या भावासारखे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा काम करण्याची संधी मिळणे ही आनंदाची बाब आहे.
मुश्रीफांचा कट्टर विरोधक पुन्हा भाजपात
समरजित घाटगे हे शरद पवार गटाचे कोल्हापूरचे नेते आहेत. ते हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांच्या विरोधात लढताना त्यांना अपयश आले होते. मात्र, त्यानंतर कागल नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही नेते एकत्र आले आणि या आघाडीची राज्यभर चर्चा झाली.
कागल नगरपरिषदेमध्ये मुश्रीफ-घाटगे आघाडीने २३ पैकी २३ जागा जिंकत विरोधकांना ‘व्हाईट वॉश’ दिला. तसेच नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने यांची निवड झाली. या विजयामुळे दोन्ही नेत्यांच्या आघाडीवर मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात होते.
त्यावेळी “एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी” असे विधानही घाटगे यांनी केले होते. मात्र, मुरगुड नगरपालिकेत या आघाडीला मोठा धक्का बसला. येथे शिंदे गटाने यश मिळवत सत्ता हस्तगत केली होती.










