MI vs PBKS : आयपीएल २०२६ च्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या पदरी सलग चौथा पराभव पडला असून, पंजाब किंग्सने वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा ७ गडी राखून धुव्वा उडवला आहे. या विजयासह पंजाबने ९ गुणांची कमाई करत गुणतालिकेत थेट पहिले स्थान काबीज केले आहे. मात्र, या सामन्यात मुंबईच्या पराभवापेक्षा मैदानावर कर्णधार हार्दिक पांड्या आणि दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात झालेला वाद अधिक चर्चेचा विषय ठरला आहे.
मैदानावर ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा: हार्दिक आणि बुमराह यांच्यात खडाजंगी?
सामना हातातून निसटत असताना मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या अत्यंत तणावात आणि नैराश्यात असल्याचे दिसून आले. या नैराश्यातूनच त्याने मैदानावरील काही खेळाडूंवर ओरडल्याचेही प्रेक्षकांनी पाहिले. सर्वात गंभीर बाब म्हणजे, गोलंदाजीदरम्यान जसप्रीत बुमराह आणि हार्दिक यांच्यात तीव्र मतभेद झाल्याचे समोर आले आहे. बुमराहला हवी तशी क्षेत्ररचना (Field Setting) देण्याऐवजी, हार्दिकने स्वतःच्या मर्जीनुसार फिल्डिंग लावल्याने बुमराह नाराज दिसला. सुरुवातीला बुमराहने यावर आक्षेप घेतला, परंतु नंतर त्याने हतबल होऊन माघार घेतली. या सर्व प्रकारामुळे संघातील अंतर्गत वादाचा परिणाम कामगिरीवर होत असल्याचे स्पष्टपणे जाणवले.
बुमराहची हतबलता: सलग पाचव्या सामन्यात बळींचा दुष्काळ
जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहसाठी आयपीएल २०२६ हा हंगाम आतापर्यंत अत्यंत निराशाजनक ठरला आहे. फलंदाजांनी बुमराहविरुद्ध बचावात्मक पवित्रा घेतल्याने त्याला विकेट्स मिळवण्यात मोठे अपयश येत आहे. सलग पाचव्या सामन्यात बुमराहला एकही बळी (Wicket) मिळवता आला नाही. मुंबई इंडियन्सच्या सलग पराभवामागे बुमराहचा फॉर्म नसणे हे एक महत्त्वाचे तांत्रिक कारण मानले जात आहे, कारण मुख्य गोलंदाज निष्प्रभ ठरल्यामुळे इतर गोलंदाजांवरील दडपण कैक पटीने वाढले आहे.
सामन्याचा ओघ: डी कॉकचे शतक व्यर्थ अन् पंजाबचा सहज विजय-
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ६ गडी गमावून १९५ धावा उभारल्या होत्या. यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने शतकी धमाका केला, परंतु दुर्दैवाने त्याचे हे वैयक्तिक यश संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला फारसा त्रास झाला नाही. सुरुवातीला अल्लाह घझनफरने प्रियांश आर्य आणि कूपर कॉनोली यांना बाद करून मुंबईच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र, त्यानंतर प्रभसिमरन सिंग (८०* धावा) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (६६ धावा) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केवळ ६७ चेंडूंत १३९ धावांची तुफानी भागीदारी करून मुंबईचे आव्हान मोडीत काढले.
अर्शदीप सिंगची भेदक गोलंदाजी आणि सामनावीर पुरस्कार-
पंजाब किंग्सच्या विजयाचा पाया अर्शदीप सिंगने रचला. त्याने आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईच्या आक्रमक फलंदाजांना रोखून धरले. अर्शदीपने ४ षटकांत केवळ २२ धावा खर्च करून ३ महत्त्वाचे बळी टिपले.











