Super El Niño Alert: यंदा उन्हाळ्याचा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता असून जगभरातील हवामान तज्ज्ञांनी ‘सुपर अल निनो’ बाबत धोक्याचा इशारा दिला आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांच्या मते, या उन्हाळ्यात हवामानातील हा अत्यंत दुर्मिळ प्रकार सक्रिय होण्याची शक्यता 90 टक्क्यांपर्यंत आहे.
हा ‘सुपर अल निनो’ इतका शक्तिशाली असू शकतो की, यामुळे 1877-1878 सालाप्रमाणेच जगभरात भीषण नैसर्गिक आपत्ती ओढवू शकतात.
Super El Niño Alert: काय आहे हा ‘सुपर अल निनो’?
‘अल निनो’ ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून यामध्ये प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील पाणी नेहमीपेक्षा अधिक गरम होते. जेव्हा हे तापमान सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसने जास्त वाढते, तेव्हा त्याला ‘सुपर अल निनो’ किंवा ‘मेगा अल निनो’ म्हटले जाते. 1950 सालापासून आतापर्यंत अशा प्रकारच्या केवळ 4 घटना घडल्या आहेत. शेवटचा मोठा अल निनो 2015-2016 मध्ये दिसून आला होता.
Super El Niño Alert: भारतासाठी धोक्याची घंटा?
भारतात आधीच उष्णतेच्या लाटेने थैमान घातले असून अनेक शहरांमधील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. विशेष म्हणजे, जगातील सर्वात उष्ण 20 शहरांपैकी 19 शहरे एकट्या भारतात आहेत, ज्यात पश्चिम बंगालमधील मेदिनिपुर 45 अंशांसह अव्वल स्थानी आहे.
- मान्सूनवर परिणाम: अल निनो सक्रिय झाल्यास भारतातील मान्सून कमकुवत होतो. पाऊस कमी झाल्यामुळे शेती क्षेत्रावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
- भीषण उष्णता: उत्तर भारतात आधीच ‘हीट डोम’ तयार झाला असून हवामान विभागाने पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. सुपर अल निनोमुळे ही परिस्थिती अधिकच बिकट होऊ शकते.
- पाणी टंचाई: पावसाचे प्रमाण घटल्यास आणि तापमान वाढल्यास जलसाठ्यांवर मोठा ताण येईल, ज्यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण होऊ शकते.
Super El Niño Alert: तज्ज्ञांचे मत काय?
जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) मते, अल निनोचा फटका केवळ पर्यावरणालाच नाही तर अर्थव्यवस्था, आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रालाही बसतो. अमेरिकेच्या हवामान केंद्राने (NOAA) वर्तवलेल्या अंदाजानुसार, मे ते जुलै दरम्यान अल निनो सुरू होण्याची शक्यता 60 टक्के आहे, जी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान 90 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.
सध्या भारतात ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ कमकुवत झाल्यामुळे पाऊस आणि बर्फवृष्टी कमी झाली आहे. अशातच सुपर अल निनोचा प्रवेश झाल्यास परिस्थिती अधिक आव्हानात्मक ठरेल. नागरिकांनी स्वतःला हायड्रेटेड ठेवावे आणि कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
हे देखील वाचा –










