Nida Khan : : नाशिक येथील बहुचर्चित धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर आता राजकीय युद्ध पेटले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आल्याने, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना जलील यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अत्यंत प्रखर शब्दांत प्रत्युत्तर दिले असून, न्यायव्यवस्थेच्या तत्त्वांची आठवण करून दिली आहे.
संजय शिरसाट पोलीस अधिकारी आहेत का?
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणाचा संबंध थेट इम्तियाज जलील यांच्याशी जोडल्यानंतर जलील यांनी संताप व्यक्त केला. “पालकमंत्री संजय शिरसाट हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिरसाट यांच्यावर यापूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ देत जलील म्हणाले की, “जेव्हा तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी का केली नाही? आताच पोलिसांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्याची तत्परता का दाखवली जात आहे?”
न्यायव्यवस्थेचे तत्त्व आणि ‘मीडिया ट्रायल’
निदा खान हिच्या अटकेबाबत भूमिका स्पष्ट करताना जलील म्हणाले की, भारतीय न्यायव्यवस्थेत जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत संशयित व्यक्ती निष्पाप मानली जाते. “इनोसंट, अनटिल प्रुव्हन गिल्टी’ (Innocent until proven guilty) हे आपल्या न्यायव्यवस्थेचे मूळ तत्व आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला म्हणजे ती व्यक्ती गुन्हेगार ठरत नाही. तिला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे कायदेशीर अधिकार आहेत.” सध्याच्या काळात आरोप होताच ‘मीडिया ट्रायल’च्या माध्यमातून लोकांना दोषी ठरवण्याची प्रवृत्ती वाढली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
दहशतवादाशी संबंध असल्याचा दावा फेटाळला
निदा खान हिच्यावर धार्मिक द्वेष पसरवल्याचे आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप आहेत. मात्र, तिचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आभास निर्माण केला जात असल्याची टीका जलील यांनी केली. “जर या मुलीचा दहशतवाद्यांशी संबंध असता, तर पोलिसांनी आतापर्यंत तिच्याविरुद्ध ‘लूकआऊट नोटीस’ किंवा अजामीनपात्र वॉरंट जारी केले असते. केवळ एफआयआरमध्ये नाव आहे म्हणून तिला फासावर लटकवण्याची मागणी करणे अनाठायी आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
राजकीय षड्यंत्राचा आरोप
एखादी व्यक्ती शहरात सापडली म्हणून त्याचा संबंध थेट माझ्याशी जोडणे हे केवळ राजकीय वैमनस्यातून केले जात असल्याचा दावा जलील यांनी केला. “पोलिसांना या प्रकरणात माझी काही चौकशी करायची असेल तर ते निश्चितपणे करतील.









