Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमध्ये भाजपाला ऐतिहासिक विजय मिळवून देणार्या सुवेंदू अधिकारी यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी कोलकात्यात त्यांच्या नावाची घोषणा केली. ते उद्या सकाळी अकरा वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. विशेष म्हणजे, लाच घोटाळ्यात त्यांच्यावर लाच घेतल्याचे आरोप झाल्यावर त्यांच्यावर सीबीआयने कारवाई केली आणि ते भाजपामध्ये आले. भाजपाने त्यांना ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवले. याच अधिकारी यांच्याकडे आता भाजपाने राज्याची धुरा सोपवली आहे.
भाजपाने पश्चिम बंगालचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि ओडिशाचे मोहन शरण मांझी आज दुपारी कोलकात्यात पोहोचले. त्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अमित शहा यांनी सुवेंदू अधिकारी यांची विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून घोषणा केली आहे. अमित शहा म्हणाले की, विधिमंडळ नेत्याच्या नावासाठी जवळपास आठ प्रस्ताव मिळाले. त्यात एकच नाव होते. दुसर्या नावासाठी पुन्हा वेळ देण्यात आला. मात्र दुसरे नाव आले नाही. त्यामुळे केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून सुवेंदू अधिकारी यांना पश्चिम बंगाल विधानमंडळाचे नेते म्हणून घोषित करण्यात येत आहे.
अधिकारी उद्या सकाळी 11 वाजता कोलकाता येथील ‘ब्रिगेड परेड ग्राउंड’वर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासह एनडीएचे अनेक प्रमुख नेते या शपथविधी समारंभास उपस्थित राहाणार आहेत. भाजपशासित 20 राज्यांचे मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहाणार आहेत. या सोहळ्याला 50,000 लोक उपस्थित राहातील, अशी शक्यता आहे.
आपल्या नावाची घोषणा झाल्यावर केलेल्या भाषणात अधिकारी म्हणाले की, बंगालचा मुख्यमंत्री म्हणून चांगली जबाबदारी निभावेन. मी भाषण कमी आणि काम जास्त करेन. बंगालला सोनार बांगला बनवण्याचा प्रयत्न करेन. मी जिवंत आहे, तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही. बंगालमधून आता भय निघून गेले आहे आणि भरवसा आला आहे. पक्ष माझ्यासाठी सर्वात वर असेल. मोदीजींनी जेवढ्या गॅरंटी दिल्या आहेत, त्या सगळ्या लोकांना देईन.
अमित शहा यांनीही अधिकारी यांचे कौतुक करत म्हटले की, अधिकारी यांना मी जवळून पाहिले आहे. त्यांचे काम पाहिले आहे. त्यांनी जो संघर्ष केला आहे तो पाहिला आहे. त्यांच्या संघर्षामुळेच बंगालमध्ये आज भाजपाची सत्ता आली आहे. बंगालच्या जनतेच्या आशा आकांक्षा नक्की पूर्ण करतील.
अमित शहा पुढे म्हणाले की, 2014 मध्ये सुरू झालेला हा प्रवास खरोखरच अभूतपूर्व आहे. 2014 ते 2026 या काळातील भाजपचा प्रवास हे, केवळ कठोर परिश्रम आणि रणनीतिक कौशल्याच्या जोरावर जनतेचा जनादेश कसा मिळवता येतो आणि त्याचे संवर्धन कसे करता येते, याचे जगातील सर्वोत्तम उदाहरण ठरले आहे. आम्ही जनतेला वचन देत आहे की, आम्ही प्रत्येक घुसखोराला केवळ बंगालमधूनच नव्हे, तर संपूर्ण देशातूनसमूळ नष्ट करू. हा ध्रुवीकरणाचा मुद्दा नाही. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे.
नारद स्टिंग ऑपरेशन काय होते?
पश्चिम बंगालमध्ये नारद समाचार पोर्टलचे संपादक मॅथ्यू सॅम्युएल यांनी केलेले नारद स्टिंग ऑपरेशन गाजले होते. एका कंपनीचे काम करून देण्याच्या बदल्यात काही खासदारांनी लाच घेतल्याचे हे स्टिंग ऑपरेशन होते. यात सुवेंदू अधिकारी यांच्यासह सौगत रॉय, प्रसून बॅनर्जी आणि काकोली घोष या तृणमूलच्या खासदारांची नावे पुढे आली होती. सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला होता. सीबीआयने लोकसभा अध्यक्षांकडे या चार खासदारांवर खटला दाखल करण्याची परवानगीही मागितली होती. मात्र, सुवेंदू यांनी तृणमूल सोडून भाजपात प्रवेश केला आणि ही चौकशी थांबली.










