Sanjeev Kapoor on Poha: भारतातील घराघरांत आवडीने खाल्ला जाणारा आणि बनवायला अत्यंत सोपा असा नाश्ता म्हणजे ‘कांदे पोहे’. इंदूरपासून पुण्यापर्यंत पोह्यांचे विविध प्रकार लोकप्रिय आहेत. मात्र, तुम्ही ज्या पोह्यांना आरोग्यदायी समजून खात आहात, ते खरोखरच तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी एका मुलाखतीत पोह्यांबाबत दिलेले मत ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो.
“भात वाईट असेल, तर पोहे त्याहून वाईट!”
पद्मश्री पुरस्कार विजेते संजीव कपूर यांनी एका पॉडकास्टमध्ये अन्नाशी संबंधित अनेक गैरसमज दूर केले. यावेळी पोह्यांवर चर्चा करताना ते म्हणाले की, “पोहे हा भारतीयांसाठी ‘कम्फर्ट फूड’ असू शकतो, पण तो आरोग्यदायी नाश्ता मुळीच नाही. जर लोक भाताला (तांदूळ) आरोग्यासाठी वाईट मानत असतील, तर पोहे त्यापेक्षाही जास्त नुकसानकारक आहेत.”
इन्सुलिनच्या पातळीवर होतो परिणाम
संजीव कपूर यांनी पुढे स्पष्ट केले की, सकाळी उठल्यावर पोहे खाल्ल्यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी अचानक वाढू शकते. पोहे हे मुळात चपट्या तांदळापासून बनवलेले असतात, ज्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते. अनेकदा इंदूरसारख्या शहरात पोह्यांसोबत जिलेबी खाल्ली जाते, ज्यामुळे साखरेचे प्रमाण अधिकच वाढते आणि ते शरीरासाठी घातक ठरू शकते.
पोहे पौष्टिक कसे बनवाल?
पोह्यांमध्ये प्रथिनांचे (Protein) प्रमाण खूप कमी असते. जर तुम्हाला पोहे खायचेच असतील, तर तज्ज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत:
- भाज्यांचा वापर: पोह्यांमध्ये भरपूर प्रमाणात गाजर, मटार आणि बीन्स यांसारख्या भाज्या घाला.
- प्रथिनांची जोड: पोह्यांसोबत मोड आलेली कडधान्ये, पनीर किंवा सोया चंक्सचा वापर केल्यास ते अधिक संतुलित होतात.
- तळलेले पदार्थ टाळा: पोह्यांवर जास्त प्रमाणात शेव किंवा फरसाण टाकणे टाळावे, कारण यामुळे कॅलरीज वाढतात.
- मर्यादित तेल: पोहे बनवताना कमीत कमी तेलाचा वापर करावा.
नाश्ता म्हणून पोहे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण ते खाताना संतुलन राखणे आणि त्यासोबत काय पदार्थ जोडले आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
हे देखील वाचा- Pune Bomb Scare: पुण्यातील नामांकित रुग्णालयाबाहेर ‘बॉम्ब’ सापडल्याने खळबळ! ७ तासांचा टायमर अन् स्फोटके; पोलिसांनी काय माहिती दिली?









