Cannes 2026 Ashok Saraf Nivedita Saraf : महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेच्या रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेली ही प्रक्रिया आता पूर्ण होणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी मतदान पार पडणार असून, २२ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होतील. राज्याच्या राजकारणात या निवडणुकीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले असून, आगामी अधिवेशनापूर्वी सभागृहातील पक्षीय बलाबल बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात गेल्या काही काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने या मतदारसंघांतील आमदारांचा कार्यकाळ संपूनही निवडणुका घेता येत नव्हत्या. त्यामुळे या जागा प्रदीर्घ काळापासून रिक्त होत्या. नियमानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येपैकी किमान ७५ टक्के मतदार संख्या उपलब्ध असेल, तरच विधान परिषदेची निवडणूक घेता येते. सध्या ही अट पूर्ण होत असल्याने निवडणूक आयोगाने या रिक्त जागांवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्यांपैकी २२ सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींमार्फत निवडून दिले जातात, त्यातील १७ जागांसाठी आता रणधुमाळी उडणार आहे.
या निवडणुकीसाठी २५ मे रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. इच्छुक उमेदवारांना १ जूनपर्यंत आपले अर्ज सादर करता येतील, तर २ जून रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जून निश्चित करण्यात आली आहे. १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि २२ जून रोजी विजयी उमेदवारांची घोषणा केली जाईल. या प्रक्रियेमुळे सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या मतदारसंघांना नवे प्रतिनिधी मिळणार आहेत.










