Home / महाराष्ट्र / Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात संतापाचा सर्वोच्च उद्रेक; ‘उद्धव ठाकरेंनी भावासारखं प्रेम केलं, पण ‘त्या’ भोसxxx च्यांच्या अंगात गद्दारी भिनलीय’ म्हणत संजय राऊतांची जीभ घसरली!

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात संतापाचा सर्वोच्च उद्रेक; ‘उद्धव ठाकरेंनी भावासारखं प्रेम केलं, पण ‘त्या’ भोसxxx च्यांच्या अंगात गद्दारी भिनलीय’ म्हणत संजय राऊतांची जीभ घसरली!

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ या अत्यंत नाट्यमय घडामोडींवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे...

By: Team Navakal
Sanjay Raut
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ या अत्यंत नाट्यमय घडामोडींवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर अत्यंत आक्रमक आणि शेलक्या शब्दांत तोंडसुख घेतले आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका वादळी पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी, पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या ६ खासदारांवर टीकेची तीव्र तोफ डागली. “ज्यांच्यावर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी मुलासारखे प्रेम केले आणि उद्धवजींनी भावासारखी साथ दिली, त्यांनीच पुन्हा एकदा पाठीत खंजीर उपसला,” असा घणाघात राऊत यांनी केला.

“चिन्हावर निवडून आलात, हिंमत असेल तर राजीनामे द्या!”
पत्रकार परिषदेत अत्यंत संतप्त झालेल्या संजय राऊत यांनी बंडखोरांना जाहीर आव्हान दिले. ते म्हणाले, “तुम्ही सर्वजण शिवसेनेच्या ‘मशाल’ या चिन्हावर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अथक मेहनतीमुळे व त्यांच्या चेहऱ्यावर निवडून आला आहात. मतदारांनी तुम्हाला शिवसेनेचे उमेदवार म्हणून मतदान केले आहे. त्यामुळे पक्षाशी आणि मतदारांशी बेईमानी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही. जर तुम्हाला दुसरीकडे जायचेच असेल, तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग काय ते करून दाखवा.”

राऊत यांनी पुढे कडक इशारा दिला की, “पूर्वी जे झाले त्याची पुनरावृत्ती आता खपवून घेतली जाणार नाही. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता आणि निष्ठावंत शिवसैनिक आता गप्प बसणार नाहीत. या गद्दारीच्या विरोधात आता रस्त्यावर जो राडा व्हायचा तो होईल, पण आम्ही शांत बसणार नाही.”

राजकीय दबाव आणि जनमानसातील असंतोष
संजय राऊत यांनी या बंडखोरीमागे सत्ताधाऱ्यांकडून केला जाणारा पैशांचा गैरवापर आणि केंद्रीय यंत्रणांचा दबाव कारणीभूत असल्याचा थेट आरोप केला आहे. लोकशाही मूल्यांचा संकोच करून अशा प्रकारे जर संसदेतील लोकप्रतिनिधी फोडले जात असतील, तर देशात निवडणुका लढवण्याला काहीच अर्थ उरणार नाही, अशी तीव्र खंत त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना शेवटपर्यंत सन्मानाची वागणूक दिली असतानाही, केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सत्तेच्या मोहापायी या खासदारांनी पक्षाशी द्रोह केल्याचे राऊत म्हणाले.

‘५० कोटींचा हमीभाव’ आणि ओमराजे निंबाळकरांविषयी खळबळजनक दावा
या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी थेट पैशांच्या देवाणघेवाणीचा आणि दबावाचा गंभीर आरोप केला. त्यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून या खरेदी-विक्रीची माहिती दिली.

५० कोटींचा हमीभाव: “महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी पुन्हा एकदा तोच ५० कोटी रुपयांचा ‘हमीभाव’ ठरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी १५ कोटी रुपयांची आगाऊ (अ‍ॅडव्हान्स) रक्कम मंगळवारी रात्रीच दिली गेली. ही रक्कम मिळाल्याशिवाय हे बंडखोर खासदार विमानात बसायलाही तयार नव्हते,” असा थेट आरोप राऊत यांनी केला. अशा पद्धतीने जर लोकशाहीत पक्ष फोडले जात असतील, तर देशात निवडणुका लढवण्याला काहीच अर्थ उरणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

खटल्याच्या निकालाचा दबाव: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. “ओमराजे यांच्या वडिलांच्या (पवनराजे निंबाळकर) खूनाचा खटला सध्या न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे. ‘हा निकाल तुमच्या बाजूने लावायचा असेल, तर आमच्या पक्षात या’, अशी थेट ऑफर आणि दबाव ओमराजेंवर टाकण्यात आला,” असा दावा राऊत यांनी केला.

‘मातोश्री’वरील शपथांचे वाभाडे
१४ जून रोजी ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या खासदारांच्या बैठकीचा संदर्भ देत संजय राऊत यांनी बंडखोरांची नैतिक लायकी काढली. त्या बैठकीला अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि संजय दिना पाटील हे चारच खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर उर्वरित ५ खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले होते.

त्या ऑनलाईन बैठकीत खासदारांनी कशा खोट्या शपथा घेतल्या, याचा पाढाच राऊत यांनी वाचला-
साईबाबांची चारवेळा शपथ: एका खासदाराने तर चक्क चारवेळा साईबाबांची शपथ घेतली. “मी तुमच्यासोबतच आहे, साईबाबांची शपथ… पत्नी आजारी आहे, साईबाबांची शपथ… दोन दिवसांत मातोश्रीवर येतो, साईबाबांची शपथ… आणि मरेपर्यंत उद्धवजींसोबतच राहणार, साईबाबांची शपथ…” असे या खासदाराने सांगितले होते.

आई भवानी आणि मुलांच्या शपथा: इतर दोन खासदारांनी अनुक्रमे आपल्या पोटच्या मुलीची आणि कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची शपथ घेऊन आपण कुठेही जाणार नसल्याचे उद्धव ठाकरेंना आश्वस्त केले होते.

“अशा सर्वोच्च आणि पवित्र शपथा घेतल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवणे आम्हाला भाग होते. मात्र, ज्यांच्या रक्तात आणि अंगातच गद्दारी भिनलेली असते, त्यांना या शपथांचे काहीच सोयरसुतक नसते, हे आज सिद्ध झाले आहे,” अशा अत्यंत कडक शब्दांत संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या