Tukaram Mundhe FDA Order : राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे आणि अन्न प्रक्रिया करणाऱ्या सर्वच घटकांसाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अत्यंत कडक नियमावली जारी केली आहे.
“सर्व अन्न व्यावसायिकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही आणि त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही,” असा थेट आणि जळजळीत इशारा आयुक्त मुंढे यांनी दिला आहे.
राज्यातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध अन्न मिळावे यासाठी एफडीएने 23 जून रोजी एक विशेष आदेश जारी करत ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत केलेल्या तपासणीत हॉटेल्सच्या किचनमध्ये अस्वच्छता, वापरलेल्या तेलाचा पुन्हा पुन्हा वापर आणि निकृष्ट दर्जाचे पॅकेजिंग अशा गंभीर त्रुटी आढळून आल्याने प्रशासनाने हे कडक पाऊल उचलले आहे.
हॉटेलमध्ये मोफत पाणी देण्याची सक्ती; समोर बोर्ड लावणे अनिवार्य
नवीन नियमांनुसार ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत:
- मोफत पिण्याचे पाणी: प्रत्येक हॉटेल आणि रेस्टॉरंटने ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. सुरुवातीलाच त्यांना बाटलीबंद पाणी देता येणार नाही.
- माहितीचा बोर्ड लावणे आवश्यक: हॉटेलमध्ये ग्राहकांना मोफत पाणी दिले जाते, असा स्पष्ट बोर्ड दर्शनी भागात लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. जर ग्राहकाने स्वतःहून मागणी केली, तरच त्याला बाटलीबंद पाणी दिले जावे.
- ग्राहकांसाठी सुविधा: हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी सुरक्षित पाणी, द्रवसाधन, साबण आणि स्वच्छ टॉवेल ठेवणे बंधनकारक असेल, जेणेकरून त्यांचे आरोग्य सुरक्षित राहील.
हॉटेलचे किचन कसे असावे? मुंढेंची ‘ही’ कडक नियमावली:
अन्नाची शुद्धता राखण्यासाठी हॉटेलच्या स्वयंपाकघरासाठी खालील अटी घालण्यात आल्या आहेत:
- स्वच्छता आणि बांधकाम: किचनच्या भिंती आणि फ्लोअरिंग हे स्वच्छ धुता येण्याजोग्या टाईल्सचे असावे, ज्यातून पाणी झिरपणार नाही. किचनमध्ये पुरेशी हवा खेळती असावी आणि एक्झॉस्ट फॅन असणे गरजेचे आहे.
- अन्नाची साठवणूक: कच्च्या मालासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी वेगवेगळे सेक्शन असावेत. तसेच कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवू नये. शाकाहारी (व्हेज) आणि मांसाहारी (नॉन-व्हेज) अन्नपदार्थ पूर्णपणे वेगवेगळे ठेवणे बंधनकारक आहे.
- कीटक नियंत्रण: किचनमध्ये माश्या मारणारे इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवणे आणि नियमितपणे पेस्ट कंट्रोल करणे सक्तीचे आहे. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी किडे, झुरळे, पाल किंवा उंदीर अजिबात आढळता कामा नयेत.
सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न उत्पादन मानके २०११ आणि अन्न सुरक्षा मानकांनुसार आपल्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करणे आणि नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. विशेषतः शाळकरी मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: “माझा मुलगा खूप लांब उभा होता…”; लोहगड मर्डर केसमध्ये नवा ट्विस्ट! आरोपीच्या वडिलांचा खळबळजनक दावा










