Sachin Ahir : विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याची चर्चा रंगली आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी २९ जून रोजी सभागृहात उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार १ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता निवडणूक होणार आहे. विधान परिषदेत महायुतीकडे स्पष्ट बहुमत असून भाजपची सदस्यसंख्या सर्वाधिक असली, तरी महायुतीतील सत्तावाटपाच्या सूत्रानुसार उपसभापतीपद शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला जाणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे या पदासाठी कोणाची निवड होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
सुरुवातीला माजी उपसभापती नीलम गोऱ्हे या या पदासाठी सर्वाधिक प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. त्याचबरोबर कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी आणि मनीषा कायंदे यांच्या नावांचीदेखील पक्षांतर्गत चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळीही एखादा अनपेक्षित निर्णय घेऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, बुधवारी सकाळी घडलेल्या एका नव्या घडामोडीने सर्वांच्याच चर्चांना वेगळे वळण मिळाले.
समोर आलेल्या माहितीनुसार, शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अर्ज दाखल करतानाची छायाचित्रेही समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. या छायाचित्रांमुळे सचिन अहिर यांनी शिंदे गटाच्या पाठिंब्याने उपसभापतीपदाच्या निवडणुकीत प्रवेश केल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी उपसभापती नीलम गोऱ्हे तसेच मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असल्याचे समोर आले आहे.
अलीकडील काळात शिवसेना (ठाकरे गट)मधील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर हा आणखी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. त्यामुळे ठाकरे गटातील संघटनात्मक आणि राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून सचिन अहिर यांच्याशी शिंदे गटाकडून संपर्क सुरू होता. शिवसेनेतील अलीकडील पक्षप्रवेशांच्या मालिकेनंतर त्यांनाही शिंदे गटात येण्याचे निमंत्रण देण्यात आल्याची चर्चा होती. त्यानंतर उपसभापतीपदाची संधी देण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात आल्यामुळे त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत पातळीवर कोणतेही सविस्तर स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही.
सचिन अहिर हे मुंबईतील वरळी परिसरातील प्रभावी राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कामगार संघटनांमध्ये त्यांचे मजबूत जाळे असून, स्थानिक संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांनी दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली आहे. वरळी मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचा परिणाम केवळ विधान परिषदेपुरता मर्यादित न राहता मुंबईतील, विशेषतः वरळी परिसरातील राजकीय समीकरणांवरही होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक आता अधिक महत्त्वाची ठरली असून, या निवडणुकीत महायुती कोणती अंतिम रणनीती अवलंबते आणि विरोधकांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सचिन अहिर यांच्या उमेदवारीमुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय संघर्षाला आणखी एक नवे वळण मिळाल्याचे चित्र सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.










