FDA Action Mumbai: मुंबईतील प्रसिद्ध आणि शतकी परंपरा असलेल्या काही हॉटेल्सचा मनमानी कारभार आता अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवाईमुळे चव्हाट्यावर आला आहे. एफडीएचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक आणि शिस्तप्रिय भूमिकेनंतर प्रशासनाने मुंबईतील 3 अत्यंत लोकप्रिय हॉटेल्सवर थेट टाळे ठोकण्याची कारवाई सुरू केली आहे.
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील या नामांकित हॉटेल्सचे अन्न परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या या अचानक झालेल्या तपासणीमुळे हॉटेल क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून, खवय्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
या ३ रेस्टॉरंट्सवर कोसळली कारवाईची कुऱ्हाड
ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य न देता नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या खालील तीन हॉटेल्सचे परवाने एफडीएने जप्त केले आहेत:
- शालिमार हॉस्पिटॅलिटी: दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेले आणि प्रसिद्ध ठिकाण.
- नूर मोहम्मदी हॉटेल: आपल्या खास पदार्थांसाठी ओळखले जाणारे ऐतिहासिक रेस्टॉरंट.
- रहमानिया रेस्टॉरंट: परिसरातील जुने आणि मोठे फूड जॉईंट.
किचनमध्ये घाण आणि कीटकांचे साम्राज्य; चौकशीत समोर आलेल्या 3 गंभीर त्रुटी
एफडीएच्या विशेष पथकाने या हॉटेल्सच्या अंतर्गत भागांची पाहणी केली असता, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाने कारवाईसाठी खालील प्रमुख मुद्दे अधोरेखित केले आहेत:
- अस्वच्छ स्वयंपाकघर: ज्या ठिकाणी शेकडो ग्राहकांसाठी अन्न शिजवले जाते, त्या किचनमध्ये प्रचंड घाण आढळून आली. इतकेच नाही तर तिथे झुरळे आणि इतर कीटकांचा वावर स्पष्टपणे दिसून आला.
- पाण्याची चाचणी नाही: ग्राहकांना पिण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेची कोणतीही कायदेशीर लॅब चाचणी करण्यात आलेली नव्हती.
- पारदर्शकतेचा अभाव: हॉटेलमध्ये वापरला जाणारा कच्चा माल कुठून येतो आणि स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाची गुणवत्ता कशी आहे, याच्या नोंदी ठेवण्याकडे व्यवस्थापनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते.
मुंबईनंतर विदर्भातही धडक कारवाई; ‘अमरावती दरबार’ बंद
एफडीएच्या या मोहिमेचा फटका केवळ मुंबईलाच बसला नाही, तर विदर्भातील अमरावती शहरातही प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अमरावतीच्या प्रसिद्ध ‘अमरावती दरबार’ या हॉटेलची तपासणी केली असता, हे हॉटेल कोणत्याही वैध अन्न परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे चालवले जात असल्याचे उघड झाले.
या गंभीर बाबीची दखल घेत प्रशासनाने हॉटेल मालकांना कडक नोटीस बजावली आहे. जोपर्यंत सर्व कायदेशीर परवाने आणि कागदपत्रे पूर्ण केली जात नाही, तोपर्यंत या हॉटेलमधील सर्व व्यावसायिक कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्याचे कठोर आदेश देण्यात आले आहेत.










