Mumbai Prohibitory Orders: राजधानी मुंबईत आगामी काळातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 23 जुलै ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 37 (3) आणि कलम 10 (2) अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व भागांत 23 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजून 1 मिनिटापासून ते 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे नियम लागू राहतील.
जमावबंदीच्या काळात ‘या’ गोष्टींवर असेल पूर्ण बंदी
या 15 दिवसांच्या कालावधीत पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय खालील गोष्टी करण्यास सक्त मनाई असेल:
- पाचपेक्षा जास्त लोकांना बंदी: सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र जमण्यास बंदी असेल.
- मोर्चे आणि आंदोलने: कोणत्याही प्रकारचे जाहीर मोर्चे, निदर्शने किंवा मिरवणुका काढता येणार नाहीत.
- लाऊडस्पीकर आणि फटाके: मिरवणुकी दरम्यान लाऊडस्पीकर, डीजे किंवा इतर ध्वनीवर्धक यंत्रांचा वापर करणे, तसेच फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी असेल.
सार्वजनिक शांतता भंग होऊ नये, नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण व्हावे आणि सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पालकांनो आणि नागरिकांनो घाबरू नका! ‘या’ गोष्टींना मिळाली सवलत
हा आदेश म्हणजे संपूर्ण शहरात लावलेला कर्फ्यू नाही. त्यामुळे दैनंदिन आणि आवश्यक कामांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. खालील गोष्टींना या नियमांमधून पूर्ण सवलत देण्यात आली आहे:
१. कौटुंबिक सोहळे: लग्नकार्ये, विवाह सोहळे आणि त्याशी संबंधित इतर घरगुती कार्यक्रमांना परवानगी असेल.
२. अंतिम संस्कार: अंत्ययात्रा, स्मशानभूमी किंवा दफनभूमीतील विधींना कोणतेही बंधन नसेल.
३. अधिकृत बैठका: कंपन्या, क्लब, सहकारी संस्था आणि इतर संघटनांच्या वैधानिक व नियमित बैठका घेता येतील.
४. मनोरंजन आणि शिक्षण: सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी गर्दी करण्यास सूट असेल. शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील.
५. व्यापार आणि न्यायालये: कारखाने, दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि न्यायालयीन कामकाजावर कोणतेही निर्बंध नसतील. तसेच संबंधित परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांची पूर्वपरवानगी घेतलेल्या मोर्च्यांना परवानगी दिली जाईल.
नियम मोडल्यास थेट कायदेशीर कारवाई; पोलिसांचे जनजागृतीचे आवाहन
हा आदेश संपल्यानंतरही, या कालावधीत नोंदवलेल्या गुन्ह्यांची चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरूच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
नागरिकांना या आदेशाची माहिती मिळावी म्हणून मुंबई पोलीस प्रमुख सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालयांमध्ये आणि न्यायालयाबाहेर नोटिसा लावणार आहेत. तसेच लाऊडस्पीकर आणि विविध माध्यम प्लॅटफॉर्म्सद्वारे या नियमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. पोलिसांनी मुंबईतील सर्व रहिवाशांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आणि विनापरवानगी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.










