BJP and Congress clash : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कुटुंबाला एक कोटीची भरपाई या आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आजही तोडगा निघाला नाही. केंद्र सरकारने आज कॉकरोच पार्टीला चर्चेसाठी आमंत्रित केले. मात्र गेल्यावेळी त्यांना पाच तास नुसतेच बसवून ठेवल्याने आता त्यांनी सरकारला स्पष्ट केले की, आम्ही चर्चेला येऊ पण ही चर्चा न्युट्रल ठिकाणी व्हावी किंवा जंतरमंतरवर व्हावी. त्यांच्या या मागणीवर काहीच प्रतिसाद आला नाही. दरम्यान आज संसदेत आणि संसदेबाहेर काँग्रेस व भाजपा एकमेकांना भिडत राहिले. विद्यार्थी आंदोलनावरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा दोन्ही पक्षांचा प्रयत्न असल्याचीच चर्चा होती.
आजच्या दिवशी जंतरमंतरवर आंदोलन शांतपणे सुरू राहिले. अभिजित दीपकेने वांगचुक यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. इतरत्र मात्र राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत उद्धव ठाकरेंची भेट घेतली, आदित्य ठाकरे यांनी 24 जुलैला मुंबईत आंदोलन जाहीर केले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्व पक्षांना पाठिंब्याचे आवाहन करीत उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला की, गेल्या 10 वर्षांत 152 वेळा पेपर फुटले, पण सरकार जबाबदारी घेण्यास तयार नाही.
संसदेत आजही गदारोळ झाला. तीन वेळा सभागृह तहकुब होऊन अखेर दिवसभरासाठी कामकाज बंद झाले. आज शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रथमच निवेदन दिले. पण विद्यार्थी आंदोलनावर काहीही न बोलता त्यांनी केवळ राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राजनाथ सिंह यांनीही हाच सूर लावला. सरकार चर्चेला तयार आहे, असे सत्ताधारी म्हणत राहिले, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय चर्चा होणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आणि तिकडे जंतरमंतरवर पावसात भिजत विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी पाय रोवून आंदोलनात ठाम राहिले.
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या चित्रफिती दाखवित म्हटले की, विद्यार्थ्यांवर हा हल्ला का होत आहे? त्यांनी चुकीचे काय केले? त्यांच्या मागण्या ते मागत आहेत. त्यांनी गुन्हा केलेला नाही. त्यांना उत्तम शिक्षण प्रणाली हवी आहे. विद्यार्थी गंभीर आहेत. गेल्या 10 वर्षांत 152 वेळा पेपरफुटी झाली. म्हणजे दर महिना एक पेपर फुटला. यांचा विद्यार्थ्यांना ताण येत आहे. साडेसात कोटी कुटुंबांवर परिणाम होत आहे. या सर्व पेपरफुटी प्रकरणात एकही दोषी आढळला नाही. कुटुंब शिक्षणावर खर्च करतात आणि मग पेपर फुटला म्हणून सांगतात. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण होऊन कमाईचे मार्ग मिटत आहेत. सरकार नीट परीक्षेसाठी 32 लाख कोटी घेतात. या सरकारने सर्व नोकर्या घालवल्या. सरकारी कंपन्यांचेही खाजगीकरण केले. शेवटी सरकारी नोकर्या हाच पर्याय राहिला. तिथेही सरकार फीचे पैसे घेते आणि पेपर फुटतात. सरकारला काही देणेघेणेच नाही.
जंतरमंतरवर पुन्हा पोलीस
आणि आंदोलकांत झटापट
जंतरमंतर मैदानावर रात्री 9.15 वाजता आंदोलन सुरू असताना दिल्ली पोलीस आणि आंदोलक विद्यार्थी आमनेसामने आले. पोलिसांनी अचानक लाठीमार केल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांसोबत जोरदार झटापट झाली. परिणामी जंतरमंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यादेखील फोडल्या.











