Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्षाने आता अत्यंत हिंसक आणि गंभीर वळण घेतले आहे. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील हायव्होल्टेज मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या सोनारपूर येथे तृणमूल काँग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या टीएमसी कार्यकर्त्यांची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी अभिषेक बॅनर्जी हे सोनारपूर परिसरात गेले होते. मात्र, ते घटनास्थळी पोहोचताच आधीच दबा धरून बसलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या एका मोठ्या जमावाने त्यांना चारी बाजूंनी वेढले आणि त्यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता या घोषणाबाजीचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला अत्यंत नियोजित आणि आक्रमक स्वरूपाचा होता. संतप्त जमावाने खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या दिशेने अंडी आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली. या गदारोळात सुरक्षा रक्षकांचे कडे तोडून काही आंदोलक थेट बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी हुज्जत घालत त्यांचा शर्ट फाडला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखले आणि सुरक्षेचा उपाय म्हणून अभिषेक बॅनर्जी यांच्या डोक्यात दुचाकीचे हेल्मेट घालून त्यांना अत्यंत शिताफीने त्या हिंसक जमावातून सुखरूप बाहेर काढले. या अनपेक्षित आणि अंगावर काटा आणणाऱ्या हल्ल्यामुळे संपूर्ण पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या भीषण प्रसंगानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे असलेले खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी आपला संताप आणि उद्वेग व्यक्त केला. ते म्हणाले, “हा केवळ निषेध नव्हता, तर ते लोक मला जीवे मारण्याच्या उद्देशानेच तिथे आले होते. जमावाने माझ्यावर हल्ला केला, माझा शर्ट फाडला. अत्यंत चिंतेची बाब म्हणजे, एवढी संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली असतानाही घटनास्थळी स्थानिक पोलिसांचा एकही जवान बंदोबस्तासाठी उपस्थित नव्हता. केवळ डोक्यावर हेल्मेट घातल्यामुळे माझे प्राण आणि डोके वाचले आहे. मात्र, विरोधी पक्षाने एक गोष्ट नीट लक्षात ठेवावी की, अशा भ्याड हल्ल्यांना आम्ही अजिबात घाबरणार नाही आणि जनतेसाठी आमचा संघर्ष असाच सुरू राहील.”
कथित बनावट स्वाक्षरी प्रकरणात ‘सीआयडी’चे समन्स
विशेष म्हणजे, या हिंसक हल्ल्याच्या काही तास आधीच अभिषेक बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ करणारी आणखी एक कायदेशीर घडामोड घडली होती. एका कथित बनावट स्वाक्षरी प्रकरणी (Fake Signature Case) पश्चिम बंगाल गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे रीतसर समन्स बजावले आहे. आगामी सोमवारी दुपारी १२ वाजता त्यांना कोलकाता येथील ‘भवानी भवन’ या सीआयडीच्या मुख्यालायात चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. माहितीनुसार, सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका पथकाने शनिवारी थेट अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी जाऊन ही कायदेशीर नोटीस त्यांच्या सुपूर्द केली.
सोनारपूर हा परिसर दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात येत असून, हा भाग तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि तीव्र राजकीय लढतीसाठी ओळखला जातो. या संवेदनशील क्षेत्रात निवडणुकांच्या काळात आणि निकालानंतरही सातत्याने राजकीय तणाव निर्माण होत असतो. राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून येथे यापूर्वीही अनेकदा हिंसक संघर्ष आणि बॉम्बफेकीच्या घटना घडल्या आहेत.









