Byju Raveendran Jail : एकेकाळी भारतातील सर्वात यशस्वी आणि अब्जाधीश उद्योजक म्हणून ओळखले जाणारे ‘बायजू’ (Byju’s) कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना मोठा धक्का बसला आहे. सिंगापूरमधील एका न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन न करणे आणि आपल्या संपत्तीविषयीची माहिती लपवणे बायजू रवींद्रन यांना महागात पडले आहे. कोर्टाने त्यांना तात्काळ अधिकार्यांसमोर शरण येण्याचे आदेश दिले आहेत.
Byju Raveendran Jail : नेमके काय आहे प्रकरण?
हा वाद एप्रिल 2024 पासून सुरू असलेल्या मालमत्ता आणि शेअर्सच्या चौकशीशी संबंधित आहे. न्यायालयाच्या मते, रवींद्रन यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक संपत्तीशी संबंधित अनेक न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन केले.
सिंगापूर कोर्टाने शिक्षेसोबतच खालील कडक निर्देश दिले आहेत:
- मोठा आर्थिक दंड: रवींद्रन यांना कोर्टाचा खर्च म्हणून 90,000 सिंगापूर डॉलर्स म्हणजेच साधारण 70,500 अमेरिकन डॉलर्स भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- मालकी हक्काचे पुरावे: ‘बीआर इन्व्हेस्टको पीटीई’ या कॉर्पोरेट कंपनीचे कायदेशीर मालकी हक्क त्यांच्याकडेच आहेत, हे सिद्ध करणारी सर्व मूळ कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या कंपनीच्या माध्यमातून एका संबंधित कंपनीत शेअर्स ठेवण्यात आले होते.
Byju Raveendran Jail : परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता दबाव
बायजू रवींद्रन यांच्यासाठी हा तुरुंगवासाचा आदेश म्हणजे एकामागून एक येणाऱ्या संकटांमधील सर्वात मोठा फटका आहे. सध्या ते जगभरातील परदेशी गुंतवणूकदारांच्या कायदेशीर कारवाईचा सामना करत आहेत. अमेरिकेतील कर्जदात्यांनी आधीच त्यांच्यावर दबाव आणला असून, तिथल्या एका कंपनीने दिलेल्या 1.2 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची वसुली करण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू केली आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणावर बायजू रवींद्रन यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच ते सध्या सिंगापूरमध्ये आहेत की इतर कोणत्या देशात, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही.
Byju Raveendran Jail : अब्जाधीश ते कोर्टाची पायरी: बायजूचा घसरता आलेख
बायजू रवींद्रन यांनी ‘थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड’ या शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीची स्थापना केली होती, जी पुढे ‘बायजू’ या नावाने जगभर प्रसिद्ध झाली. या कंपनीच्या अफाट यशामुळे रवींद्रन हे भारतातील एक आघाडीचे अब्जाधीश बनले होते. जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या स्टार्टअपमध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली होती.
मात्र, कंपनीतील अंतर्गत व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांची कपात आणि आर्थिक तोट्यामुळे कंपनी वादात सापडली. कतार सरकारच्या ‘कतार इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी’ या सार्वभौम संपत्ती निधीच्या एका उपकंपनीने रवींद्रन यांच्याविरोधात सिंगापूरच्या न्यायालयात धाव घेतली होती. या कंपनीने बायजूच्या पडत्या काळात मोठी गुंतवणूक केली होती, परंतु नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारला आणि आता कोर्टाने रवींद्रन यांना थेट तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
हे देखील वाचा – Karnataka Political Crisis: कर्नाटक राजकारणात मोठा भूकंप! मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देण्याची शक्यता; डीके शिवकुमार यांच्याकडे सत्ता?










