Mahua Moitra vs Yogi Adityanath: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ऐतिहासिक ब्रीदवाक्य चुकीच्या पद्धतीने स्वामी विवेकानंदांच्या नावे सांगितल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
Mahua Moitra vs Yogi Adityanath: नेमका वाद काय?
बंगालमध्ये झालेल्या एका रॅलीत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी “तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन” (Give me blood and I will give you freedom) हे अजरामर वाक्य स्वामी विवेकानंद यांनी म्हटले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात हे वाक्य आझाद हिंद फौजेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आहे.
हा चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने भाजपवर ‘बंगालच्या इतिहासाचा अपमान’ केल्याचा आरोप केला आहे.
Hello Bulldozer Buddhi @myogiadityanath get your facts right. Netaji Subhash Bose said “Give me blood and I will give you freedom”. Swami Vivekananda did NOT say it. Please go back to drinking Fanta in UP and leave Bengal alone. You’re a joke.
— Mahua Moitra (@MahuaMoitra) April 20, 2026
Mahua Moitra vs Yogi Adityanath: महुआ मोइत्रा यांची ‘बुलडोझर बुद्धी’वरून टीका
महुआ मोइत्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर योगी आदित्यनाथ यांचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले, “हॅलो ‘बुलडोझर बुद्धी’ योगी आदित्यनाथ, आधी तुमची माहिती तपासा. ‘तुम्ही मला खून द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन’ हे वाक्य नेताजींचे आहे, स्वामी विवेकानंदांचे नाही. कृपया उत्तर प्रदेशात जाऊन फँटा प्या आणि बंगालला एकटे सोडा. तुम्ही एक थट्टा बनले आहात.”
तृणमूल काँग्रेसची आक्रमक भूमिका
तृणमूल काँग्रेसने आपल्या अधिकृत हँडलवरून या घटनेचा निषेध करताना म्हटले की, भाजपला बंगालच्या महापुरुषांमधील फरकही समजत नाही. स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस ही दोन वेगळी व्यक्तिमत्त्वे असून दोघांचा वारसा वेगळा आहे. एकाच वाक्यात या दोन्ही सुपुत्रांचा अपमान करण्यात आला आहे.
“ज्यांना महापुरुषांचे विचार आणि वाक्ये नीट माहीत नाहीत, ते ‘सोनार बांगला’ घडवण्याचे स्वप्न पाहत आहेत,” असा टोलाही पक्षाने लगावला आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये 23 एप्रिल आणि 29 एप्रिल अशा दोन टप्प्यात मतदान होणार असून 4 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापुरुषांच्या नावावरून सुरू झालेला हा वाद निवडणुकीत महत्त्वाचा ठरू शकतो.









