Prasant Kishor – देशातील अनेक बड्या नेत्यांना आणि पक्षांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवणारे प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prasant Kishor)आता स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. बिहारमधील हायप्रोफाईल बांकीपूर (Bankipur Assembly)विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ( by-election)प्रशांत किशोर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
जन सुराज (Jan Suraj) पक्षाने या संदर्भातील अधिकृत उमेदवारी जाहीर केली. निवडणूक रणनीतीकार ते सक्रिय राजकारणी बनलेल्या प्रशांत किशोर यांच्या संपूर्ण आयुष्यातील ही पहिलीच प्रत्यक्ष निवडणूक असल्यामुळे आता या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी 2025 च्या बिहार विधानसभा मुख्य निवडणुकीत ते उभे राहणार अशा चर्चा होत्या, मात्र त्यांनी तेव्हा स्वतः निवडणूक लढवली नव्हती.
नितीन नबीन यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली जागा

बांकीपूर विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक अचानक का होत आहे, यामागील राजकीय पार्श्वभूमी खालीलप्रमाणे आहे:
- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद: या मतदारसंघातून 2025 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन नबीन (Nitin Nabin)विजयी झाले होते. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली.
- आमदारकीचा राजीनामा: राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर नितीन नबीन यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड करण्यात आली. एकाच वेळी दोन सभागृहांचे सदस्य राहता येत नसल्याने त्यांनी बिहार विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि ही जागा रिक्त झाली.
“एकटा आमदार २४२ जणांवर भारी पडणार”; उमेदवारीनंतर प्रशांत किशोर यांचा दावा
तिकीट जाहीर झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत बांकीपूरच्या मतदारांना थेट आव्हान केले आहे:
“बांकीपूरमधील मतदार हे संपूर्ण बिहारमध्ये सर्वात सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांनी कोणत्याही दबावाशिवाय सर्वोत्तम उमेदवाराची निवड करावी. जर तिथल्या जनतेला माझ्यावर विश्वास वाटत असेल, तर त्यांनी मला संधी द्यावी. माझ्या पक्षाचा विधानसभेत भलेही मी एकमेव आमदार असेन, परंतु माझे काम सभागृहातील इतर २४२ आमदारांपेक्षा अधिक प्रभावी आणि वजनदार असेल.
बांकिपूर पोटनिवडणुकीत केवळ जन सुराजच नव्हे तर इतर पक्षही सक्रिय झाले आहेत.
- भाजपकडून उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही
- अजय अलोक, नील रतन घोष आणि अजित कुमार लाली यांची नावे चर्चेत
- जनता जनशक्ति दल (JJD) कडून वीणा मानवी यांना उमेदवारी
३० जुलैला मतदान, ३ ऑगस्टला निकाल; भाजपची रणनीती गुलदस्त्यात
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, बिहारच्या बांकीपूरसह देशातील इतर 3 रिक्त जागांसाठी 30 जुलै 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर 3 ऑगस्ट 2026 रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर केला जाईल.
या महत्त्वाच्या जागेसाठी राजकीय हालचाली वेगवान झाल्या असून, बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्या ‘जनशक्ती जनता दल’ पक्षानेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. मात्र, आपला बालेकिल्ला राखण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) अद्याप आपल्या पत्त्यांचा खुलासा केलेला नाही.
हे देखील वाचा –
अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर; केतनच्या मृत्यूनंतर आजोबांची प्राणज्योत मालवली
पद उपकार म्हणून मिळत नाहीत’; वडिलांच्या समर्थनार्थ किरण अहिर मैदानात
पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी केइको फुजीमोरी; निवडणूक आयोगाची अधिकृत घोषणा










