PM Modi on Gold : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक भू-राजकीय अस्थिरतेचे पडसाद आता भारतीय अर्थव्यवस्थेवर उमटू लागले आहेत. एकीकडे इंधन टंचाईचे सावट गडद होत असतानाच, दुसरीकडे देशातील परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. आखाती देश, अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या शस्त्रसंधी झाली असली, तरी भविष्यातील संभाव्य आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी भारतीयांनी किमान वर्षभर ‘सुवर्ण खरेदी’ टाळावी, असे विधान पंतप्रधानांनी केले आहे. या आवाहनामुळे देशातील सुवर्ण व्यवसायावर चिंतेचे सावट पसरले असून सराफ बाजारात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पंतप्रधानांच्या या भूमिकेमुळे वर्षानुवर्षे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात अशा प्रकारचे आवाहन केल्याने सराफ व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मुंबईतील महत्त्वाच्या सुवर्ण बाजारपेठांमध्ये आज शुकशुकाट पाहायला मिळाला. या संदर्भात व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अनेक नामवंत सराफांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास स्पष्ट नकार दिला. “सरकारच्या या आवाहनामुळे ग्राहक दुकानांकडे पाठ फिरवण्याची भीती असून, व्यवसायाचे गणित कोलमडण्याची शक्यता आहे,” अशी भावना दबल्या आवाजात व्यापारी व्यक्त करत आहेत.
या संपूर्ण परिस्थितीत सुवर्ण व्यवसायाला उतरती कळा लागली असली, तरी ‘इमिटेशन ज्वेलरी’ (कृत्रिम दागिने) क्षेत्रासाठी मात्र सुगीचे दिवस येण्याची चिन्हे आहेत. सोन्याचे गगनाला भिडलेले भाव आणि त्यातच सरकारी स्तरावरून करण्यात आलेले आवाहन, यामुळे मध्यमवर्गीय ग्राहक आता आपला मोर्चा स्वस्त आणि आकर्षक अशा इमिटेशन ज्वेलरीकडे वळवण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, जेथे सराफ बाजारात चिंतेचे वातावरण आहे, तिथेच कृत्रिम दागिने विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
इंधन निर्बंधांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट; “आधी मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करा”, जनतेचा सरकारला रोखठोक सवाल-
सर्वसामान्यांना बचतीचे आवाहन करणाऱ्या सरकारने स्वतःच्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी, अशी आक्रमक भूमिका आता नागरिकांनी घेतली आहे. प्रशासनाकडून लादल्या जाणाऱ्या बंधनांमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त करत, जनतेने थेट सत्ताधाऱ्यांच्या उधळपट्टीवरच बोट ठेवले आहे.
वाहनधारकांनी आपला संताप व्यक्त करताना सरकारला काही परखड प्रश्न विचारले आहेत. “सामान्यांना इंधन बचतीचे धडे देण्यापूर्वी मंत्र्यांच्या ताफ्यात धावणाऱ्या गाड्यांची संख्या कमी का केली जात नाही?” असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे. अनेकदा एकाच कार्यक्रमासाठी किंवा उद्घाटनासाठी तीन-तीन मंत्र्यांची उपस्थिती कशासाठी, असा आक्षेपही नोंदवण्यात आला आहे. व्हीआयपी संस्कृतीमुळे होणारी इंधनाची नासाडी थांबवण्यासाठी मंत्र्यांनी आपले दौरे मर्यादित करावेत आणि जास्तीत जास्त उद्घाटन सोहळे किंवा बैठका ‘ऑनलाईन’ पद्धतीने पार पाडाव्यात, असा सल्ला संतप्त नागरिकांनी दिला आहे.









