Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘महाविकास आघाडी’ (MVA) मधील अंतर्गत मतभेद आणि अस्वस्थता पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) संस्थापक शरद पवार यांनी विधानभवनात एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन आपल्या पक्षाची बैठक घेतल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. “ज्या गद्दाराने आपले हक्काचे सरकार पाडले, त्याच गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा बैठका घेतल्या, तर यामुळे मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता जनतेच्या नजरेत कमी होते,” अशा कडक शब्दांत राऊत यांनी शरद पवारांच्या कृतीवर गुरुवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत थेट शरसंधान साधले.
विधानभवनातील ‘त्या’ बैठकीवरून वाद पेटला
बुधवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्ना संदर्भात विधानभवनात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार विधानभवनात गेले होते. एकनाथ शिंदे यांनीही सुरू असलेली मंत्रिमंडळाची (कॅबिनेट) बैठक अर्धवट सोडून दालनात येत शरद पवारांचे स्वागत केले होते. या राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
“अख्खं विधानभवन ओस पडलं होतं का?” – राऊतांचा सवाल
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी शरद पवारांच्या या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेतले. ते म्हणाले,”शरद पवार हे देशातील आणि राज्यातील अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत, यात शंका नाही. परंतु, ज्या एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची कीड आणि गद्दारीची वाळवी लावली, त्यांच्या दालनात जाऊन अधिकृत बैठक घेणे राजकीयदृष्ट्या योग्य नाही. अशा भेटींमुळे आणि बैठकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता धोक्यात येते. मला प्रशासनाला विचारायचे आहे की, काल अख्खं विधानभवन ओस पडलं होतं का? विधानभवनाच्या अगदी समोरच राष्ट्रवादी भवन आणि शिवसेना भवनच्या इमारती आहेत. ते कमी पडले म्हणून थेट विधिमंडळातील सत्ताधाऱ्यांच्या दालनात बैठका घेतल्या जातात का? उद्या जर आम्ही अजित पवारांच्या किंवा एकनाथ शिंदेंच्या दालनात जाऊन पक्षाची बैठक घेतली, तर आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात गेलो, असा अर्थ काढला जाईल. त्यामुळे मविआच्या सर्वच घटकपक्षांनी काही राजकीय नियम आणि मर्यादा पाळायला पाहिजेत.”
“आम्ही इतके सहिष्णू नाही, ही कृती शिवसेनेला दुखावणारी”
आपली तीव्र भावना व्यक्त करताना राऊत पुढे म्हणाले की, हे मत आमच्यासारख्या पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांचे आहे. “आम्ही राजकीयदृष्ट्या इतकेही सहिष्णू नाही आणि आमचे मन एवढे मोठे नाही. ज्यांचे मन मोठे आहे त्यांनी ते करावे. शरद पवारांच्या या कृतीमुळे मविआतील सर्वच घटकपक्ष आणि कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. आम्ही जर त्यांच्या जागी असतो, तर अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांच्या दालनात कधीही बैठक घेतली नसती. शरद पवार यांच्या कालच्या या कृतीने संपूर्ण शिवसेना अस्वस्थ आहे. या गोष्टीची खरं तर अजिबात गरज नव्हती. तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला यातून काय संदेश देत आहात? तुम्ही एकप्रकारे गद्दारांना राजकीय प्रतिष्ठा बहाल करत आहात. जर आपण गद्दारांना अशी प्रतिष्ठा देणार असू, तर भविष्यात आपल्या पक्षात झालेल्या गद्दारीविषयी बोलण्याचा नैतिक हक्क आपल्याला राहत नाही. मग त्या गद्दारांविरोधात न्यायालयात जाणे आणि कायदेशीर लढाई लढणे याला काय अर्थ उरतो?” असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला.
विचारधारेवर शंका नाही, पण एकनाथ शिंदे ‘यशवंतराव’ नाहीत!
संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले की, शरद पवार हे कधीही भाजप किंवा ‘एनडीए’ (NDA) सोबत जाणार नाहीत, याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही आणि त्यांच्या विचारधारेवर संशय घेण्याचे कारण नाही. मात्र, तरीही शिंदेंच्या दालनाचा वापर करणे मनाला लागल्याचे सांगत त्यांनी जुन्या मुख्यमंत्र्यांचे दाखले दिले. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे हे काय महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण किंवा शंकरराव चव्हाण आहेत का? ते वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक किंवा विलासराव देशमुख आहेत का, की ज्यांच्या दालनात जाऊन एवढ्या ज्येष्ठ नेत्याने बैठक घ्यावी? ही गोष्ट आमच्या मनाला तीव्रतेने लागली आहे.”










