नवी दिल्ली – साखर कारखान्याच्या शिल्लक बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारने अखेर परवानगी दिली आहे. ६ डिसेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने बी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीला बंदी घातली होती.पण सरकारने आता ही बंदी उठवली आहे.त्यामुळे कारखानदारांसह शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बी हेवीच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेली ७०० कोटी रुपयांची रक्कम खुली होण्यास मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल ३८ कोटी लिटरची निर्मिती वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. सरकारने देशांतर्गत साखरेच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच साखरेचा पुरेसा पुरवठा राहावा म्हणून हा निर्णय घेतला होता. साखर नियंत्रण कायदा १९६६ च्या कलम ४ आणि ५ नुसार इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्यात आली होती.अन्न पुरवठा मंत्रालयाने ७ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या आदेशात ‘साखरेचा रस आणि सिरप’ पासून इथेनॉल बनवण्यावर बंदी घातली असल्याचे म्हटले होते.