नवी मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे माजी स्वीय सचिव संजीव पालांडे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात नाव आल्यानंतर अटक करून निलंबित केले होते.मात्र आता जामिनावर सुटल्यावर पालांडे यांना पुन्हा कामावर रजू करण्यात आले आहे.पालांडे यांची नवी मुंबईतील कोकण भवन येथे करमणूक कर उपायुक्त म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयानेही त्यांच्या नवी मुंबईतील नियुक्तीला मान्यता दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने संजीव पालांडे यांना जामीन मंजूर करताना मुंबईची हद्द सोडू नये,अशी अट घातली होती.त्यामुळे त्यांना मुंबईतून नवी मुंबईत कामावर येण्यास अडचण निर्माण झाली होती.त्यामुळे पालांडे यांचे वकील आकाश पांडे यांनी पालांडे यांना नवी मुंबईला जाण्याची परवानगी द्यावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेला ईडीने विरोध केला होता.मात्र न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी अर्जदाराने त्याच्यावर लादलेल्या कोणत्याही अटी व शर्तींचे उल्लंघन केले आहे, अशा तक्रारीचे हे प्रकरण नसल्याचे सांगितले.तसेच अर्जदाराने यापूर्वीच कोकण भवन येथे उपायुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. संपूर्ण परिस्थिती विशेषत: अर्जदाराच्या पुनर्नियुक्तीची वस्तुस्थिती लक्षात घेऊन, कोकण भवन येथील कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी अर्जदाराला नवी मुंबईला जाण्याची परवानगी देण्यास हरकत नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.