उरण- रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एमआयडीसीचे रानसई धरण आटले असल्याने आता उरणकरांना आठवड्यातून दोन दिवस पाणी मिळणार नाही.आता मंगळवार आणि शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
उरण तालुक्याला दररोज १० एमएलडी पाण्याची आवश्यकता असते.त्यापैकी ६ एमएलडी पाणी रानसई धरणातून घेतले जाते. तर ४ एमएलडी पाणी सिडकोकडून विकत घेतले जाते.मात्र रानसई धरणाची पाणीपातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत एक फुटाने कमी झाली आहे.त्यामुळे ३० जून पर्यंत पाणी पुरविण्यासाठी पाणीकपात लागु करणे भाग पडत आहे.रानसई धरण डोंगर कपारीत सुमारे ६.८ चौरस किलोमीटर क्षेत्रात १९७०मध्ये बांधण्यात आले आहे.या धरणाची पाणी साठवण क्षमता १० मिलियन क्युबिक मीटर इतकी आहे.