लातूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) नेते दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत देशाच्या विकासाचे भ्रामक चित्र सर्वसामान्यांसमोर उभे करण्याचा प्रयत्न करतात. ते साफ खोटे आहे. मोदींच्या गेल्या दहा वर्षांच्या काळात देशाचा काडीचाही विकास झालेला नाही, असा हल्ला काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी लातूरच्या उद्गीरमध्ये आयोजित सभेत केला. महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजीराव काळगे यांच्यासाठी प्रियंका यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
मागील ४५ वर्षांतील सर्वाधीक बेरोजगारी गेल्या दहा वर्षांत निर्माण झाली आहे. बेरोजगारांची संख्या ७० कोटींवर गेली आहे. दुसरीकडे केंद्रात ३० लाख पदे रिक्त आहेत. मागील दहा वर्षांत मोदी सरकारने ही रिक्त पदे भरली नाहीत.महागाई सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे महिलांना संसार चालविणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तुवर सरकार जीएसटी लावते. त्यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा प्रकारे सर्वसामान्य माणूस मोदी सरकारच्या राक्षसी धोरणांमुळे घेरला गेला आहे, हेच मोदीराज्याचे सत्य आहे,अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
संपूर्ण मीडिया मोदींच्या सोबत आहे. त्यामुळे देशाचे हे विदारक चित्र तुम्हाला टीव्हीवर दिसत नाही. ते तुमच्या रोजच्या जीवनात दिसेल. ते पहा, त्याचा गांभीर्याने विचार करा आणि योग्य उमेदवाराला विजयी करा,असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले. देशात पुन्हा जर मोदींचे सरकार आले तर ते संविधान बदलतील. तुमचे अधिकार कमी करतील, असा इशाराही प्रियंका गांधी यांनी दिला.