कराची- कारगिल युद्धाबाबत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. पाकिस्तानी लष्कराने १९९९ मध्ये भारताविरुद्ध कारगिल युद्धाचा कट रचला. त्याला मी विरोध केल्यानेच लष्कराने मला पंतप्रधानपदावरून हटविले, असे नवाज शरीफ यांनी लाहौरमध्ये झालेल्या जाहीर सभेत सांगितले.
नवाज शरीफ पुढे म्हणाले की, मागे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ यांनी मला पंतप्रधानपदावरुन हटविले.मला दरवेळेला पदावरून का काढले जाते, तेच कळत नाही. भारतासोबत जिव्हाळ्याचे संबंध आम्हाला निर्माण करावेच लागतील, हे माझे म्हणणे पाकिस्तानच्या हिताचेच आहे. मी पंतप्रधान असताना भारताचे दोन पंतप्रधान पाकिस्तानच्या भूमीवर आले. ते पाकिस्तानातील दुष्प्रवृतींना सहन झाले नाही. पाकिस्तानची आर्थिक दुर्दशा केवळ शेजाऱ्यांसोबत होणाऱ्या भांडणांमुळे झालेल्या वाढीव लष्करी खर्चाने झाली आहे. इम्रान खान यांना केवळ क्रिकेट आणि चंगळ कळते. देश कसा चालवायचा, आंतरराष्ट्रीय व्यवहारातील काहीही कळत नाही. भारताविरुद्ध गरळ ओकली की, इथे राजकारणात स्थिरावता येते, हा काही लोकांचा समज बनलेला आहे. इम्रान खानही त्याला अपवाद नाहीत.