प्रत्त्येक खुणेमागे १० हजार रुपये
चंदीगड
देशातील बहुतांश भागांत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लोक जखमी किंवा मृत्युमुखी पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने
अशा प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल, असे म्हटले आहे. त्यामुळे कुत्रा चावल्यास दाताच्या प्रत्येक खुणेमागे किमान १० हजार रुपये आणि प्रत्येकी ०.२ सेमी जखमेसाठी किमान २० हजार रुपये भरपाई द्यावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
भटक्या प्राण्यांच्या हल्ल्यांशी संबंधित १९३ याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. देशात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबरमध्ये वाघ बकरी टी ग्रुपचे कार्यकारी संचालक ४९ वर्षीय पराग देसाई यांचा कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यू झाला. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीने जोर धरला.दरम्यान, उच्च न्यायालयाने या प्रकरणी पंजाब, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडला एक समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. ही समिती भटक्या प्राण्यांमुळे झालेले अपघात अथवा हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये भरपाई देण्याबाबत निर्णय घेईल. यामध्ये गाय, बैल, बैल, गाढव, कुत्रे, नीलगाय, म्हैस या जनावारांचा आणि इतर जंगली, पाळीव प्राण्यांचा समावेश आहे.