रत्नागिरी : यंदा एल निनो वर्ष असल्याने पावसाचा लहरीपणा, पावसातील खंड, असमान पर्जन्यवृष्टी आणि सुरुवातीपासून रुसलेला पाऊस याचा परिणाम होऊन यंदा खरिपातील भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या मध्यापासून आतापर्यंत कोकण किनारपट्टी भागात दमदार पाऊस झाला असला तरी त्यात सातत्य नव्हते. जून आणि ऑगस्ट हे खरिपाचे महतत्वाचे महिने तर कोरडेच गेले. या सर्वांच्या परिणामाने यंदा खरिपात उत्पादन किमान २० ते १५ टक्के घटण्याची शक्यता आहे.
या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीला बसणार आहे. भाताचे उत्पादन यंदा २० टक्के घटण्याची शक्यता जिल्हा कृषी विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पावसाची अनियमितता आणि पाण्याअभावी भातरोपांना अधिकचे फुटवे आलेले नाहीत. काही ठिकाणी रोपांची उंचीच वाढलेली नाही. कातळावरील रोपे पिवळी पडल्याने रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती मात्र, सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने ही भातशेती काही प्रमाणात तारुन नेली. ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने पाठच फिरवली. त्यानंतर कडकडीत उन्हाने भातशेती जणू करपत होती. त्यामुळे उत्पादकतेवरही परिणाम होण्याची भीती आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र, मोक्याच्या वेळी पावसाने पाठ दाखविल्याने जिल्ह्यातील अनेक भागांत भातशेतीबरोबरच नाचणी पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची भीती आहे.