मुंबई – शहराची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला कोस्टल रोड प्रकल्प मे महिन्यात पूर्ण सेवेत येणार आहे. परंतु वरळी ते मरीन लाइन्सदरम्यान चार लेनची एक मार्गिका १९ फेब्रुवारीपासून सेवेत येणार आहे. या एका मार्गिकेचे ९६ टक्के काम पूर्ण झाले असून १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे.
कोस्टल रोडला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा असे नाव देण्यात आले आहे. संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले. कोस्टल रोड प्रकल्पात एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रिट उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतूच्या (वांद्रे- वरळी सीलिंक) दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. कोस्टल रोड प्रकल्पात २ बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत ९६ टक्के काम पूर्ण झाले असून १९ फेब्रुवारीला थडानी जंक्शन, वरळी ते मरीनलाइन्सदरम्यान एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे.