छत्रपती संभाजीनगर – आम्हाला मुंबईत मारहाण झाली, गोळ्या घातल्या तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्वाणीचा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला. दरम्यान, सरकार पक्षातर्फे मंत्री संदीपान भुमरे यांनी आज मनोज-जरांगे यांची भेट घेतली.
मनोज जरांगे-पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईतील आंदोलनाचा मार्ग व दिशा गुरुवारी जाहीर करण्याची घोषणा त्यांनी केली. ते म्हणाले की, मुंबईतील आंदोलनाचा मार्ग कसा असेल हे आम्ही गुरुवारी स्पष्ट करू. आमचा लढा हा महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे. हा लढा आरक्षण मिळेपर्यंत सुरू राहील. मुंबईतील आंदोलनात मराठे मुंग्यांसारखे बाहेर पडतील. त्यामुळे कुणीही घरी बसू नका. आपण बसून राहिलो, तर आपल्या मुलांचे हाल होतील. त्यामुळे मुंबईकडे चला हा माझा नारा आहे. आम्हाला गोळ्या घातल्या, मारहाण केली तरी आम्ही मुंबई आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. मुंबईत गेल्यानंतर आम्ही कोणत्याही स्थितीत मागे हटणार नाही. सर्व शक्ती, सर्व ताकद पणाला लावायची तयारी आहे.
मुंबईत येण्याविषयी जरांगे म्हणाले की, “सरकार २० जानेवारीपर्यंत आरक्षण देण्याची भाषा करत आहे. त्यांनी तोपर्यंत दिले तर आम्हालाही मुंबईला जाण्याची फार हौस नाही. मराठा समाला ओबीसीतून आरक्षण मिळाले अशी आमची भूमिका आहे. मराठा व कुणबी एकच असल्याचे लाखो पुरावे सापडलेत. त्यानंतरही आम्हाला त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या फुफाट्यात कशाला ढकलत आहात, आम्हाला त्याद्वारे दिले जाणारे आरक्षण टिकणार आहे का? आम्ही ते नाकारले नाही. आम्हाला सर्व मान्य आहे. पण सरकारने ते टिकेल की नाही हे स्पष्ट करावे. ते टिकणारे असेल तर ते आम्हाला मान्य आहे, अन्यथा नाही.”