मुंबई- घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो वन ची मालकी आता एमएमआरडीए कडे येणार आहे. या मेट्रोचे संचलन करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रा या कंपनी विरोधातील दिवाळीखोरीची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने नुकतीच निकाली काढली. या कर्जाच्या परतफेडीची हमी एमएमआरडीएने दिल्यामुळे ही मेट्रो १ आता त्यांच्या मालकीची होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ३३७ किलोमिटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील पहिल्या मेट्रोची बांधणी खाजगी सार्वजनिक भागिदारी तत्वावर करण्यात आली होती. यामध्ये रिलायन्स इन्फ्राचा ७४ टक्के तर एमएमआरडीएचा २६ टक्के हिस्सा होता. या मार्गिकेचे संचलन रिलायन्स इन्फ्रा करत आहे. ही कंपनी तोट्यात असल्याने त्यांनी सहा बँकांकडून १ हजार ७११ कोटी रुपये कर्ज घेतले होते. त्यातील स्टेट बँक व आयडीबीआय बँकेने राष्ट्रीय कंपनी प्राधिकरणाकडे धाव घेतली होती. कंपनीनेही आपला हिस्सा विकण्यासाठी २०२० मध्ये राज्य सरकारला पत्र पाठवले होते. त्यानंतर एमएमआरडीएने हा हिस्सा विकत घेण्याचे ठरवून १७५ कोटी रुपयांची परतफेड केली. यावर राष्ट्रीय कंपनी प्रधिकरणाने रिलायन्स इन्फ्राची दिवाळखोरीची याचिका निकाली काढली. त्यामुळे आता या कंपनीची मालकीही एमएमआरडीए कडे येणार आहे. यापुढे घाटकोपर वर्सोवा मेट्रो मार्गाची मालकी ही एमएमआरडीएची राहणार आहे.