- नासाचा अहवाल
वॉशिंग्टन
सतत बदलणारे ऋतुचक्र आणि बदलणारी चंद्राची भ्रमणकक्षा यांमुळे काही वर्षातच पृथ्वीवर समुद्राच्या पातळीत मोठी वाढ होऊन महाप्रलय होण्याची भीती अंतराळ संशोधन संस्था नासाने व्यक्त केली आहे. नासाचे नियतकालिक नेचर जर्नलमध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
नासाच्या अभ्यासानुसार चंद्राच्या पृथ्वीभोवती भ्रमणकक्षेतील सतत बदलत्या स्थितीमुळे २०३० मध्ये समुद्राच्या पातळीत मोठी वाढ होऊन प्रचंड मोठी भरती येईल आणि सर्वत्र मोठ्या लाटा उसळून पृथ्वीचा बराचसा भाग जलमय होण्याची शक्यता आहे. जगभरात समुद्र किनारपट्टीच्या भागात सातत्याने पूरपरिस्थिती उद्भवून त्यामुळे वारंवार मोठे नुकसान होईल असा नासाचा अंदाज आहे.
चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रात भरती, ओहोटीची होते. चंद्रामुळेच आतापर्यंत समुद्र संतुलित राहिलाय. पण चंद्राने आपल्या कक्षेत जराही बदल केला तर हे संतुलन बिघडणार. नासाच्या अहवालानुसार चंद्र ठराविक काळानंतर मूळ कक्षेपासून हलकासा सरकतो. यात अर्ध्या काळात तो समुद्रातील लाटांवर दबाव निर्माण करतो, तर अर्ध्या काळात लाटांचा वेग वाढवतो. नासानुसार आत्ता यातील लाटांचा वेग वाढण्याचा काळ असून ही प्रक्रिया २०३० पर्यंत सुरू होईल. या काळात समुद्राची पातळी प्रचंड प्रमाणात वाढलेली असेल आणि तसे झाल्यास मोठ्या विनाशाची शक्यता आहे.