सांगली
राज्यातील गावागावात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने प्रशासनाकडून गावात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र ऐन दुष्काळी परिस्थितीत जत तालुक्यात टॅंकर चालकांनी आज सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे जत तालुक्यासह आजूबाजूच्या पाणी पुरवठा ठप्प झाले आहे.
वाढत्या तापमानामुळे राज्यातील नदी, तलाव, धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे राज्यात सर्वच ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. ही टंचाई निवारण्यासाठी पराशासनाकडून कृती आराखडा तयार करून टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असताना गावात नागरिक आणि टॅंकर चालकांचा वाद झाला. काही ठिकाणी टॅंकर चालकांना मारहाण झाल्याचे देखील प्रकार घडले. यामुळे जत तालुक्यात टँकर चालकांनी अघोषित कामबंद आंदोलन सुरू केले. या दरम्यान उटगी येथील तलावावर ४० हुन अधिक टँकर चालकांनी ठिय्या केला असून पाणी टॅंकर न भरण्याचा पवित्रा घेतला. यामुळे काल रात्रीपासून संख, माडग्याळसह ३० ते ४० गावांचा पाणी पुरवठा बंद आहे.