मुंबई -मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात आंदोलन सुरू असताना मराठा आरक्षण उपोषणकर्ते जरांगे पाटलांच्या टीकेनंतर भाजपचे आमदार नितेश राणेंनी त्यांंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. आमदारांची घरे पेटवली. त्याविरुद्ध देवेंद्र फडणवीसांनी अतिशय कडक भूमिका घेतली. त्या भूमिकेचे समर्थन करण्यापेक्षा जरांगेंनी त्यांच्यावर टीका केली. याचा असा अर्थ होतो का, जरांगे पाटील या हिंसेचे समर्थन करत आहेत, त्यांची स्क्रीप्ट कोठून तरी लिहून येत आहे?, असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला.
नितेश राणेंच्या या वक्तव्याला जरांगे पाटील म्हणाले की,‘तुम्ही काल माझ्याशी फोन करुन गोडगोड बोलतात. आता पुढे बोलू नका. मराठा तरुणावर खोटे गुन्हे दाखल करू नका, महाराष्ट्र शांत आहे, सरकारचे लोक गोंधळ घालत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी स्वत: बीडमध्ये जाऊन एसपी, जिल्हाधिकाऱ्यांसमोर बसेन. त्यावेळी माझ्यासोबत 5 लाख आंदोलक येतील, अथवा 10 लाख आंदोलक येतील, मला त्याची काळजी नाही. लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला आंदोलन करु द्या, नाहीतर उद्या मी स्वत: तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही. मराठे काय असतील हे तुम्हाला मग कळेल. मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशासतसे उत्तर देऊ.`