मुंबई – सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन संदर्भातला अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे.जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल मंगळवारी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.महाराष्ट्र राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी ही माहिती दिली.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनबाबतचा अहवाल २१ नोव्हेंबरला सरकारला सादर करण्यात आला आहे. बक्षी समितीकडून अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे अहवाल सुपूर्द करण्यात आला आहे. जुन्या पेन्शन योजने संदर्भात राज्य सरकारने माजी सनदी अधिकारी सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती गठित केली होती. सुबोधकुमार,सुधीर श्रीवास्तव, के.पी.बक्षी हे या समितीमध्ये होते. ही अभ्यास समिती यावर्षी १४ मार्च रोजी शासनाने गठित केली आहे. या समितीला दोन वेळा मुदतवाढ मिळाली आहे.जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलने,उपोषणे केली आहेत.केंद्राप्रमाणे राज्यातही जुनी पेन्शन योजना लागू करावी,अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.