पालघर- जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात रेल्वे मालवाहू प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यासाठी गांगणगाव (कांदलीपाडा) येथील आदिवासी कुटुंबाची घरे पोलीस बळाचा वापर करून जमीनदोस्त करण्यात आली. मात्र एक वर्ष उलटून गेले. तरी या आदिवासी कुटुंबांना घराचा मोबदला मिळालेला नाही.त्यामुळे ही कुटुंबे अद्याप बेघर आहेत,अशी माहिती आदिवासी अस्मिता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विलास वांगड यांनी दिली.
गांगणगाव (कांदलीपाडा) येथील प्रभू लाडक्या राजपूत,नवश्या लक्ष्या कचरा,हरजी लक्ष्या कचरा, कमलेश गोवारी,वना काकड्या गोवारी या आदिवासींची राहती घरे या प्रकल्पासाठी जमीनदोस्त करण्यात आली आहेत.राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली. पण त्यांना मोबदला काही दिलेला नाही. ही घरे आणि झाडे ही प्रकल्पासाठी तोडली.पण या कुटुंबाच्या निवाऱ्याचा कुणीही विचार केलेला नाही. यासंदर्भात संबंधित अधिकारी काहीही माहिती देत नाहीत,असा आरोप बाधित शेतकरी प्रभू राजपूत यांनी केला आहे.