नवी दिल्ली –
भारताला गरज असूनही आणि निर्यातीचा करार झाला असतानाही मोझांबिकने तूर निर्यात कमी केली आहे. मोझांबिकमधील तुरीची काढणी कधीच झाली आहे, त्यामुळे त्यांच्याकडे तुरीचा मोठा साठा आहे, मात्र जास्त भावाच्या अपेक्षेने तूर निर्यात होत नसल्याने भारत सरकारने मोझांबिकला करार रद्द करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, भारतात सध्या तुरीची टंचाई आहे. त्यामुळे ऐन सणासुदीला देशात तूर डाळीचे भाव वाढले आहेत. भारत सरकारने या आधीच मोझांबिकसोबत २०२५-२६ पर्यंत प्रत्येक वर्षी दोन लाख टन तूर आयातीचे करार केले आहेत. मोझांबिकच्या तुरीलाही भारतात चांगला भाव मिळत आहे, परंतु येथील निर्यातदारांना आणखी भावाची अपेक्षा असल्याने त्यांनी तुरीची निर्यात रोखली आहे. मोझांबिकमधील निर्यातदार भारताच्या अडचणीचा फायदा घेण्यासाठी तूर निर्यातीला जाणूनबूजून उशीर करत आहेत. त्यामुळे मोझांबिकसोबतचे करार रद्द करावेत, अशी मागणी इंडिया ग्रेन्स अॅन्ड पल्सेस असोसिएशनने (आयपीजीए) केली होती. आता केंद्र सरकारनेही मोझांबिकला इशारा दिला आहे. मोझांबिकमध्ये तुरीची डाळ खात नाही. केवळ निर्यातीसाठी तुरीचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे आयातीचे करार मोडले तर मोझांबिकला अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.