कराड- सातारा- लातूर राष्ट्रीय महामार्गावर सात दिवसांपूर्वी दिशा घोरपडे या कॉलेज विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला.त्यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे अखेर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी त्या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आणि कंपनीला पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले.
सातारा-लातूर रस्त्याचे काम बर्याच दिवसांपासुन रखडले आहे.त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.त्यातच ३ डिसेंबरला दिशा घोरपडे या १९ वर्षीय कॉलेज तरुणीचा याच रस्त्यावर क्षेत्र माहुली येथे अपघातात मृत्यू झाला. ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेत अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक घेतली.याच बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या रस्त्याचे काम करत असलेल्या मेघा इंजिनियरिंग या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आणि या कंपनीला पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले.