देशातील पहिल्या ‘कॅशलेस’ गावातील व्यवहार रोखीनेच

ठाणे- जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धसई हे गाव देशातील ‘कॅशलेस’ गाव म्हणून ओळखले जाते. आठ वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालिन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तशी घोषणा केली होती. मात्र याठिकाणची वस्तुस्थिती वेगळीच आहे. कारण या गावातील व्यवहार अद्याप रोखीनेच सुरू आहेत.
केंद्र सरकारने या गावाला ‘कॅशलेस’ गाव म्हणून बहुमान दिला आहे. मात्र तेथील शासकीय योजनांमध्येही प्रत्यक्षात ‘कॅशलेस’ सुविधा दिसत नाही. या गावातील रेशनिंग दुकान, किराणा मालाचे दुकान, मेडीकल, भाजीपाला, दुधासह दैनंदिन खरेदी-विक्री व्यवहार अद्याप रोखीनेच चालू आहेत. विशेष म्हणजे येथील अनेक नागरिकांचे ‘कॅशलेस’साठी बॅंकेत खातेच नाही. काही व्यापाऱ्यांकडे असलेल्या ‘कॅशलेस’साठीच्या मशीन्स बंद पडल्या आहेत. गावाला सरकारी योजनांचा लाभही मिळालेला नाही. दररोज मजुरी करणारा आदिवासी बांधव ‘कॅशलेस’ म्हणजे काय असे विचारत आहे. या गावातील रहिवासी असलेल्या प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव अ‍ॅड. राजेश घोलप यांनी तर आमच्या गावातील १०० टक्के व्यवहार हे रोखीने चालत असल्याचा दावा केला आहे. तर एका सामाजिक संघटनेचे पंकज वाघ यांनी तर मुरबाड या तालुक्याच्या ठिकाणीच अद्याप ‘कॅशलेस’
सुविधा उपलब्ध नाहीत. मग धसई गाव कसे ‘कॅशलेस’ होऊ शकते असा सवाल केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top