छत्रपती संभाजीनगर
कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कन्नड तालुक्यात गव्हाली तांडा येथे अंकुश हिंमत चव्हाण (३५) यांनी सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दुसरीकडे, गंगापूर तालुक्यातील सावंगी येथील गणेश वसंत पवार (३८) यांनी रविवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली.
अंकुश यांच्याकडे तीन एकर शेती आहे. शेतीसाठी दुकानदाराकडून उधार बियाणे, खते खरेदी केली होती. पावसाने तब्बल २ महिने उघडीप दिल्याने मकाचे पीक पूर्णपणे वाळून गेले. त्यामुळे कर्ज, ट्रॅक्टरचे हप्ते कसे फेडायचे, याची चिंता विवंचनेत अंकुश महिनाभरापासून होते. अखेर सोमवारी सकाळी त्यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत, शेतकरी गणेश पवार यांच्यावर बँकेचे कर्ज होते ते कसे फेडावे, नापिकीमुळे ते सतत तणावाखाली होते. शनिवारी ते सायंकाळी उशिरापर्यंत घरी आले नाही. घरच्यांनी सर्वत्र शोधून अखेर पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान, दिवाळीच्या दिवशी रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास मार्तंडी नदीजवळील एका शेतात ते मृतावस्थेत आढळून आले. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.