मुंबई- मागील दोन वर्षांपासुन मुंबई पालिकेत प्रशासकीय राज सुरू आहे. या काळातच पालिकेच्या विविध १५ प्रमुख विभागांची जबाबदारी कोणतेही अधिकार नसलेल्या प्रभारी अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे.त्यामुळे पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे काही वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांचे मत आहे.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ५९,९५४ कोटींचा असून पालिकेकडे ८४ कोटींच्या ठेवी आहेत. एव्हढा मोठा कारभार असलेल्या पालिकेच्या प्रत्येक विभागात प्रमुख अभियंत्यांची नियुक्ती केलेली असते.मात्र मागील दोन वर्षांच्या काळात १५ ठिकाणच्या प्रमुख अभियंत्यांची जबाबदारी उप प्रमुख अभियंत्यांवर सोपविली आहे.वास्तविक हे प्रभारी पद असल्याने त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. केवळ ते पद रिक्त असल्याचे दिसू नये म्हणून तात्पुरता पदाचा कारभार या अभियंत्यांकडे देण्यात आला आहे.पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन,रस्ते,पूल आदींसारख्या महत्वाच्या विभागांत हे प्रभारी अभियंते असल्याने त्यांचा प्रत्यक्ष कामकाजावर परिणाम होत असल्याचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.तरी पालिका प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेऊन याठिकाणी कायम प्रमुख अभियंत्यांची नेमणूक करावी अशी मागणीही या वरिष्ठ अधिकार्यांनी केली आहे.