नंदुरबार- अक्कलकुवा तालुक्यातील गमनचा उमरपाडा येथील देवनदीच्या खाडीत पिक-अप गाडी पडून दोन जण जागीच ठार झाले,तर तीन जण जखमी झाले.हा भीषण अपघात आज बुधवारी सकाळी घडला.जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघातातील मृतांची नावे राजू ओंकार बारेला (३०), रा. कर्जाना, ता. चोपडा, जि. जळगाव व पोपट दत्तू सोनवणे (४०), रा. नाशिक अशी आहेत.तर जखमींमध्ये गाडीतील चालक कैलास पाटील (रा. नाशिक) याच्यासह ज्ञानेश्वर उत्तम वाघ,रा. कुंजर, ता. चाळीसगाव, सुनील बड्या पावरा,रा. खर्डी खुर्देचा पाटीलपाडा,ता.धडगाव यांचा समावेश आहे. याबाबत चालकाविरुद्ध मोलगी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.नाशिक येथील कैलास पाटील हा पिक-अप गाडीमधून मजूर घेऊन अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा येथे जात होता. यावेळी पिंपळखुटा ते गमनचा उमरपाडा रस्त्यावर चालक कैलास पाटीलने गाडी भरधाव चालविल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट देवनदीच्या खाडीत कोसळली.यात राजू आणि पोपट सोनवणे या दोघांचा जागीच मृत्यू झाला.गाडीतील चालक पाटील, ज्ञानेश्वर वाघ आणि सुनील पावरा हे गंभीर जखमी झाले.