पुणे- पुणे जिल्ह्यात सत्ताधारी पक्षांमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाच्या विरोधात जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे.
पुणे जिल्हा नियोजन समितीमधील भाजपा आणि शिंदे गटांच्या स्थानिक नेत्यांनी अजित पवार गटाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. परस्पर पत्रांद्वारे कामे करण्याची पद्धत आता चालणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. अजित पवार हे मनमानी करतात आणि भाजपा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सूचवलेली कामे होत नाहीत. त्याचप्रमाणे केवळ अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याच्या कामांना प्राधान्य दिले जाते असेही त्यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोणतेही इतिवृत्त नसताना ८०० कोटींची कामे मंजूर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ती कामे रद्द करावी अशी मागणीही जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
भाजपा आणि शिंदे गटाला नाममात्र फंड उपलब्ध करण्यात येतो. त्याच्या निषेधार्थ भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील आणि जीवन आप्पा कोंडे यांच्या नेतृत्वात भाजपा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. ८०० कोटींची कामे रद्द न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.