बंगळुरु – कर्नाटकाची राजधानी बंगळुरुमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी मिळणे अवघड झालेले असताना काही नागरिक या पाण्याचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईच्या परिस्थितीत गाड्या धुण्यासाठी पाणी वापरणाऱ्या २२ नागरिकांकडून १.१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. देशातील ही दुर्मिळ घटना असल्याचे बोलले जात आहे.
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात बंगळुरु पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाने वाहने धुणे, बागांना दररोज पाणी देणे, इमारतींचे बांधकाम सोसायट्यांमधील पाण्याची कारंजी, वॉटर पार्क, सिनेमा हॉल आणि मॉल्स, रस्त्यांची बांधकामे आणि स्वच्छता मोहीम यासाठी पाण्याचा वापर करण्यास बंदी घातली आहे. पाण्याचा गैरवापर करताना कोणी आढळले तर त्याला जागेवरच दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये २२ नागरिकांनी या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. त्यामुळे त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.